औरंगाबाद: कोरोनाचे मोठे संकट देशावर ओढवलेले आहे, जगभरात हजारो लोकांचे प्राण आतापर्यंत या महामारीने घेतले आहेत. त्यामुळे या संकटाशी सर्व पातळीवर सामना करण्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी करणे महत्त्वाचे आहे.
काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत खासदारांच्या मानधनात तीस टक्के कपात व पुढील दोन वर्ष खासदार निधीची रक्कम आरोग्य सुविधांसाठी वळवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला निर्णय योग्यच असल्याचे मत शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सरकारनामाशी बोलताना व्यक्त केले.
शेवटी विकास हा लोकांसाठीच करायचा असतो, लोकांचे जीव वाचवणे महत्त्वाचे आहे .त्याला प्राधान्य देऊन घेतलेला निर्णय योग्यच आहे, विकासकामे पुढेही करता येतील असेही खैरे यांनी स्पष्ट केले.
चंद्रकांत खैरे म्हणाले, मी वीस वर्ष खासदार होतो,आम्हाला मिळणाऱ्या निधीतून मतदारसंघातील रस्ते ,पाणीपुरवठा योजना ,सभागृह , सभामंडप , शाळेची इमारत अशी छोटी मोठी कामे केली जातात. त्यामुळे काही प्रमाणात या निधीचा उपयोग मतदारसंघाच्या विकासासाठी निश्चितच होतो .
परंतु आज देशावर जे संकट आले आहे त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे. सध्या देशासमोर सर्वसामान्य जनतेच्या जीविताचे या महामारीपासून रक्षण करणे हे मोठे आव्हान आहे .त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आरोग्य विभाग अधिक सक्षम करणे गरजेचे आहे.
खासदार निधीच्या दोन वर्षाची रक्कम आरोग्य सुविधांसाठी वळवण्याचा निर्णय परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊनच घेण्यात आला आहे, या निर्णयाचे मी स्वागत करतो .शेवटी ज्या जनतेसाठी विकास कामे करायची आहेत त्यांचे जीव वाचवणे महत्वाचे आहे, विकासकामे दोन वर्षांनी सुद्धा केली जातील.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.