CM Maharashtra news
CM Maharashtra news  Sarkarnama
ब्लॉग

CM Maharashtra : मुख्यमंत्रिपदासाठी नशीबही लागतं का ?

प्रकाश पाटील - Prakash Patil

CM Maharashtra : राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या तीन नेत्यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून फ्लेक्स झळकले. त्यानंतर या मुद्द्यावरूनही राजकारण सुरू झाले. (CM Maharashtra latest news)

सरपंच, आमदार, खासदार, मंत्री कोण होणार, हे जरी प्रमुख नेत्यांच्या हातात असले, तरी सध्या मुख्यमंत्री कोण होईल, हे काही सांगता येत नाही. आतापर्यंत राज्याचा मुख्यमंत्री केंद्रातूनच ठरविला जायचा. आजही तेच होते. मात्र, कोणाचे नशीब कधी फळफळेल, हे काही सांगता येत नाही.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकदा म्हटले होते, की इंदिरा गांधींचा राजकीय वारसदार म्हणून संजय गांधी यांचे नाव घेतले जायचे. दुर्दैवाने त्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आणि जे पायलट होते, ते राजीव गांधी देशाचे पंतप्रधान बनले. देवेगौडा पंतप्रधान होतील असे कोणाला वाटले होते का? पण ते बनले. त्यामुळे राजकारणात कधी काहीही होऊ शकते.

क्षमता असूनही संधी नाही

महाराष्ट्रात आजपर्यंत जे मुख्यमंत्री बनले, त्यांपैकी बहुसंख्य मुख्यमंत्री कॉँग्रेसचे होते. त्यांपैकी बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री होतील, असे कोणाला वाटले होते का? कॉँग्रेसला बहुमत होते तोपर्यंत पक्षश्रेष्ठीच ठरवत असत कोणाला मुख्यमंत्री करायचे ते. याचा अर्थ, आमदारांना विश्‍वासात घेतले जात नाही असे नाही. शेवटी मुख्यमंत्रिपदाचा जो उमेदवार असतो, त्याच्या मागे किती आमदार आहेत, हेही लक्षात घेतले जाते. हे खरे असले, तरी पक्षश्रेष्ठींची मर्जीही सांभाळावी लागते.

कधी अंगी क्षमता असूनही मुख्यमंत्री होऊ न शकलेले राज्यात असे अनेक नेते आहेत. राष्ट्रवादी, भाजप, कॉँग्रेसमध्ये प्रत्येकी सहा-सात नेते असे आहेत, की जे राज्याचे नेतृत्व करू शकतात. पण, संधी मिळाली नाही. अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ असतील किंवा आणखी काहींची नावे घेता येतील. तेही मुख्यमंत्री होऊ शकतात, पण संधी मिळाली नाही. सध्याचा आघाडीचा जमाना. तडजोडीचे राजकारण करावे लागते. मॅजिक फिगर त्यात महत्त्वाचा भाग असतोच. असो.

ठाकरेच मुख्यमंत्री बनले

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डी दौऱ्यात राष्ट्रवादीच्या सर्व भावी मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देताना सांगितले, की २०१९ मध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होतील असे कोणाला वाटले होते का? फडणवीस यांचे हे म्हणणे अगदी बरोबर आहे. कारण, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच निवडणूक लढविली नाही. मात्र, त्यांचा सरकारवर रिमोट कंट्रोल होता.

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे कधी निवडणूक लढवतील असे वाटले नव्हते ; परंतु पितापुत्र निवडणुकीच्या मैदानात उतरले. उद्धव मुख्यमंत्री, आदित्य मंत्री बनले. त्यानंतर घडामोडी घडल्या अन्‌ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले. शिवसेनेतील फुटीनंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आणि शिंदे हे उपमुख्यमंत्री होतील, असे संपूर्ण महाराष्ट्राला वाटले होते. पण, काय झाले? शिंदे मुख्यमंत्री, तर फडणवीस उपमुख्यमंत्री बनले.

बहुमतही महत्त्वाचे

भाजप-शिवसेना २०१९ मध्ये एकत्रितपणे लढले होते. बहुमतही मिळाले होते. दोन्ही पक्षांना जनतेने कौल दिला होता. फडणवीस मुख्यमंत्री होणार, हे निश्चित झाले होते, पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले. म्हणजेच खुद्द फडणवीस यांना दोन वेळा मुख्यमंत्रिपदाने हुलकावणी दिली.

राज्यातील बहुमताचे सरकार कॉँग्रेसचे होते. त्याच कॉँग्रेसचे आज काय झाले, हा भाग वेगळा. गेल्या पंचवीस ते तीस वर्षांत विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत मिळविता आले नाही. आघाडी, युती करूनच सत्ता स्थापन करावी लागली. आजच्या अस्थिर राजकारणात कोण मुख्यमंत्री होईल आणि कोणाला लॉटरी लागेल, हे काही सांगता येत नाही. जो कोणी मुख्यमंत्री बनेल, तो नशीबवानच म्हणावा लागेल!  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT