Priyanka Gandhi and Rahul Gandhi 
ताज्या बातम्या

बहिणीची हिंमत पाहून राहुल गांधी म्हणाले...

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथे घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

सरकारनामा ब्युरो

लखीमपूर खिरी (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खिरी (Lakhimpur Kheri) येथे घडलेल्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या ताफ्याने काल (ता.3) आठ जणांना चिरडले होते. यात चार शेतकरी (Farmers) आणि चार भाजप कार्यकर्त्यांचा समावेश आहे. मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असलेल्या काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांना पोलिसांनी अटक केली आहे. यावर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बहिणीचे कौतुक केले आहे.

राहुल गांधी यांनी ट्विटरवर बहिणीचे कौतुक केले आहे. त्यांनी #NoFear आणि #लखीमपुर_किसान_नरसंहार असे दोन हॅशटॅगही वापरले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, प्रियांका, मला माहिती आहे की तू मागे हटणार नाहीत. तुझ्या हिमतीमुळे ते घाबरले आहेत. न्यायाच्या या अहिंसक लढाईत आपण देशाच्या अन्नदात्याला विजयी करूनच दाखवू.

लखनौपासून 90 किलोमीटर अंतरावरील सीतापूर येथील विश्रामगृहात त्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. याचा व्हिडीओही प्रियांका गांधी यांच्या टीमने प्रसिद्ध केला आहे. मला येथून सोडल्यानंतर मी लखीमपूर खीरीतील मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे अश्रू पुसण्यासाठी जाणार आहे. मला केवळ त्यांच्या दु:खात सहभागी व्हायचे आहे. दरम्यान, काल रात्री प्रियांका गांधी आणि पोलिसांमध्ये मोठा वाद झाला होता. त्यांना अडवणाऱ्या पोलिसांकडे त्यांनी अटक वॉरंट दाखवण्याची मागणी केली होती. अखेर पोलिसांनी त्यांना स्थानबद्ध केले होते.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेली वर्षभरापासून शेतकरी शांततामय मार्गाने आंदोलन करीत आहेत. काल लखीमपूर खिरी येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे आले होते. त्यावेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री मिश्रा यांचा मुलगा आशिष आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली होती. याचवेळी ही घटना घडली होती. यात 4 शेतकरी आणि 4 भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे.

मिश्रा आणि मौर्य यांच्या मोटारींचा ताफा काल दुपारी तिकोनिया चौकातून जात असताना त्यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी शेतकरी धावले. त्याचवेळी ताफ्यातील दोन मोटारी त्या गर्दीत घुसल्या. त्यामुळे अनेक शेतकरी चिरडले गेले. ही घटना पाहताच शेतकरी आणखी संतप्त झाले. आंदोलक शेतकऱ्यांनी त्या दोन्ही गाड्यांना आग लावल्याचे सांगण्यात येते. या घटनेत एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मौर्य यांनी भवानीपूर गावातील आपला दौरा रद्द केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT