Judge Uttam Anand
Judge Uttam Anand File Photo
ताज्या बातम्या

त्या न्यायाधीशांची ठरवूनच हत्या! सीबीआय तपासात धक्कादायक माहिती उघड

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : झारखंडमधील धनबादमध्ये जिल्हा न्यायाधीश मॉर्निंग वॉक करत असताना त्यांची हत्या (Judge Killing) करण्यात आली होती. याची सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) स्वत:हून दखल घेतली होती. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपास केला असून, न्यायावैद्यक अहवालही तपासला आहे. न्यायाधीशांची ठरवून हत्या करण्यात आली, या निष्कर्षापर्यंत सीबीआय पोचली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयने घटनास्थळ आणि त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. यातून न्यायाधीश आनंद यांची कट आखून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील पुरावे तपासण्यासाठी देशभरातील चार स्वतंत्र न्यायवैद्यक पथकांचा सहभाग होता. या प्रकरणी अटक केलेल्या दोन आरोपींची ब्रेन मॅपिंग आणि नार्को अॅनालिसिस टेस्ट करण्यात आली आहे. या टेस्ट गुजरातमधील गांधीनगरमध्ये करण्यात आल्या. या प्रकरणाचा तपास आता अंतिम टप्प्यात आला आहे. या प्रकरणाच्या तपासावर देखरेख ठेवणाऱ्या सीबीआयच्या सहसंचालकांना तपासातील प्रगती सादर करण्यासाठी आज हजर राहण्यासही झारखंड उच्च न्यायालयाने दिले आहेत.

झारखंडमधील धनबाद येथे जिल्हा न्यायाधीश उत्तम आनंद यांची हत्या करण्यात आली होती. ही घटना 28 जुलैला सकाळी घडली होती. पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद करण्यास विलंब केल्याने सुरूवातीला या घटनेचे गांभीर्य समोर आले नव्हते. घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावरील रस्त्यावर रिक्षाने न्यायाधीश आनंद यांना धडक दिली होती. यात त्यांचा मृत्यू झाला होता. न्यायाधीश आनंद हे पहाटे पाच वाजता मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. ते रस्त्याचे कडेने चालत होते. त्याचवेळी काही अंतरापर्यंत रस्त्याच्या मधून जाणारी रिक्षा न्यायाधीशांच्या जवळ आल्यानंतर अचानक त्यांच्या दिशेने वळते आणि थेट त्यांना धडक देऊन पुढे निघून जात असल्याचा व्हिडीओ समोर आला होता. हत्येच्या उद्देशानेच रिक्षा धडकवण्यात आल्याचेही यामुळे स्पष्ट झाले होते.

न्यायाधीश आनंद हे रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे एका व्यक्तीने पाहिले. त्यानेच त्यांना रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर काही तास त्यांची ओळखच पटली नाही. सकाळचे सात वाजले तरी ते घरी न परतल्याने कुटूंबियांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी शोधाशोध केल्यानंतर रुग्णालयात अपघाती मृत्यू झालेल्या व्यक्तीची माहिती मिळाल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला होता.

उत्तम आनंद यांच्या हत्येनंतर संपूर्ण न्यायव्यवस्थाच हादरून गेली आहे. सर्वोच्च न्यायालयातील बार असोसिएशनने हा मुद्दा सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्यासमोर उपस्थित केला होती. सरन्यायाधीशांनी या प्रकरणी झारखंड उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांशी चर्चा होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT