Digvijay Singh and Luizinho Faleiro
Digvijay Singh and Luizinho Faleiro File Photo
ताज्या बातम्या

दिग्विजयसिंहांनी राज्यपालांकडे जाऊ न दिल्याने सत्ता गेली! माजी मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : गोव्यात (Goa) सत्ता स्थापन करण्यासाठी आम्ही राज्यपालांकडे जाणार होतो पण ऐनवेळी आम्हाला पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह (Digvijay Singh) यांनी रोखले. यामुळे बहुमत असूनही हातातोंडाशी आलेला घास गेला असा गौप्यस्फोट काँग्रेसचे (Congress) माजी मुख्यमंत्री लुईझिन्हो फलेरो (Luizinho Faleiro) यांनी केला आहे. त्यांच्या या गौप्यस्फोटाने खळबळ उडाली आहे. फलेरो यांनी नुकताच तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) प्रवेश केला आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना फलेरो म्हणाले की, गोव्यात 2017 मध्ये हातातोंडाशी आलेला घास गेला होता. त्यावेळी काँग्रेसला बहुमत होते. पक्षाचे नेते दिग्विजयसिंह हे काँग्रेसचे प्रभारी होते. माझ्या नेतृत्वाखाली 17 आमदार जिंकले होते. याचबरोबर एका अपक्ष आमदारासह एकूण चार आमदारांचा पाठिंबाही काँग्रेसला असल्याने संख्याबळ 21 झाले होते. त्यावेळी सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांकडे आम्ही जाणार होतो परंतु, आम्हाला ऐनवेळी दिग्विजयसिंह यांनी रोखले. त्यांनी 24 आमदारांचे संख्याबळ असावे, असा आग्रह धरला.

आम्ही राज्यपालांकडे जाण्यास विलंब लावत असताना भाजपने बहुमताचा आकडा जमवून सत्ता स्थापन केली. याबद्दल मी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही पत्र लिहिले होते. मागील साडेचार वर्षांत काँग्रेसचे संख्याबळ 18 आमदारांवरून 5 आमदारांवर आले आहे. काँग्रेसच्या 13 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला पण त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. गोव्यात काँग्रेसने लढाई लढलीच नाही त्यामुळे पक्षाचे अस्तित्व संपत चालले आहे. याचमुळे मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला, असे फलेरो यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, फलेरो यांनी नुकताच कोलकता येथे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत नऊ जणांसह तृणमूलमध्ये प्रवेश केला. यावेळी खासदार अभिषेक बॅनर्जीही उपस्थित होते. फेलेरो यांच्यासह गोवा काँग्रेसचे माजी सरचिटणीस यतिश नाईक व विजय वासुदेव पोय, माजी राज्य सचिव मारिओ पिंटो डी सँटना व आनंद नाईक, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कवी शिवदास सोनू नाईक, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते व माजी आमदार लहू मामलेदार, दक्षिण गोवा वकील संघटनेचे अध्यक्ष अँटोनियो मोंटेरिओ क्लोविस दा कोस्टा, राजेंद्र शिवाजी काकोडकर हे तृणमूलमध्ये दाखल झाले आहेत.

या वेळी पक्षाला गोव्यात सत्ता स्थापन करण्याबाबत अपेक्षा होती. पण दिग्गज नेत्यानं सोडचिठ्ठी दिल्यानं पक्षाला यावेळी इतर नेते व कार्यकर्त्यांना एकसंध ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काँग्रेसमध्ये सुधारण्याची कोणतीच आशा वाटत नाही. गोवा काँग्रेसमध्येही सर्वकाही ठीक नाही. भाजपविरोधात लढण्यासाठी ममता बॅनर्जी यांच्यासारख्या लढवय्याची गरज असल्याचे फलेरो दोन दिवसांपूर्वी म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT