Lakhimpur Kheri
Lakhimpur Kheri 
ताज्या बातम्या

लखीमपूर खीरी : मृत शेतकऱ्यांना 45 लाख भरपाई, कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी अन् घटनेची न्यायिक चौकशी

सरकारनामा ब्युरो

लखीमपूर खिरी (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खिरी (Lakhimpur Kheri) येथे घडलेल्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या ताफ्याने काल (ता.3) आठ जणांना चिरडले होते. यात चार शेतकरी (Farmers) आणि भाजप कार्यकर्त्यांचा समावेश आहे. याची दखल घेत अखेर भाजप सरकारने मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 45 लाख रूपये, त्यांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी आणि या प्रकरणाची न्यायिक चौकशी करण्याचा आदेश दिला आहे.

लखीमपूर खिरीतील घटनेमुळे भाजप सरकार अडचणीत आले आहे. मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जाणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना ताब्यात घेतले जात आहे. पोलिसांनी लखीमपूर खिरीमध्ये जमावबंदी लागू केली आहे. या घटनेची तीव्रता लक्षात घेऊन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना 45 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. याचबरोबर या प्रकरणी न्यायिक चौकशी करण्याची घोषणाही त्यांनी केली आहे.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेली वर्षभरापासून शेतकरी शांततामय मार्गाने आंदोलन करीत आहेत. काल लखीमपूर खिरी येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे आले होते. त्यावेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री मिश्रा यांचा मुलगा अभिषेक आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली होती. याचवेळी ही घटना घडली होती. यात 4 शेतकरी आणि 4 भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे.

मिश्रा आणि मौर्य यांच्या मोटारींचा ताफा काल दुपारी तिकोनिया चौकातून जात असताना त्यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी शेतकरी धावले. त्याचवेळी ताफ्यातील दोन मोटारी त्या गर्दीत घुसल्या. त्यामुळे अनेक शेतकरी चिरडले गेले. ही घटना पाहताच शेतकरी आणखी संतप्त झाले. आंदोलक शेतकऱ्यांनी त्या दोन्ही गाड्यांना आग लावल्याचे सांगण्यात येते. या घटनेत एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मौर्य यांनी भवानीपूर गावातील आपला दौरा रद्द केला होता.

शेतकऱ्यांवर झालेल्या या हल्ल्याबाबत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ट्विट करून संताप व्यक्त केला होता. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते की, कृषी कायद्याविरोधात शांततेने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना भाजप सरकारच्या गृह राज्यमंत्र्यांच्या मुलाने आपल्या गाडीखाली चिरडणे हे अत्यंत अमानवी आणि क्रूर आहे. उत्तर प्रदेश यापुढे अशा अहंकारी भाजप नेत्यांची जबरदस्ती सहन करणार नाही. ही परिस्थिती अशीच राहिली तर उत्तर प्रदेशात भाजप नेते गाडीतून फिरू शकणार नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT