PM Narendra Modi Latest Marathi News
PM Narendra Modi Latest Marathi News Sarkarnama
देश

एका बाजूला वेदनांनी भरलेले हृदय तर दुसऱ्या बाजूला कर्तव्यपथ; पंतप्रधान मोदी भावूक

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशाने त्यांना अभिवादन केले. मात्र गुजरातेतील मोरबी येथे झुलता पूल कोसळून शेकडो जणांना प्राण गमवावे लागल्याच्या भीषण दुर्घटनेचे सावट या कार्यक्रमावर राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून सर्व नेत्यांनी पटेल जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात मोरबीत प्राण गमावलेल्यांप्रती शोक-संवेदना व्यक्त केली.

पंतप्रधानांनी आज गुजरातमधील केवडिया येथील सरदार पटेल यांच्या स्मारकावर आदरांजली वाहिली. मात्र मोरबीतील घटनेने मोदी कमालीचे व्यथित झाल्याचे दिसले. आजचा हा राष्ट्रीय एकता दिनाचा निमित्त आपल्याला या कठीण प्रसंगाला एकजुटीने सामोरे जाण्याची आणि कर्तव्याच्या मार्गावर राहण्याची प्रेरणा देत आहे. अत्यंत कठीण परिस्थितीत सरदार पटेल यांचा संयम, त्यांच्या तत्परतेतून शिकून आम्ही काम करत राहिलो आणि करत राहिलो, असे मोदी यांनी नमूद केले. (PM Narendra Modi Latest Marathi News)

त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, अशी वेदना मी माझ्या आयुष्यात क्वचितच अनुभवली आहे. एका बाजूला वेदनांनी भरलेले हृदय आणि दुसऱ्या बाजूला कर्माचा आणि कर्तव्यपथ आहे. मोरबीतील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. या दु:खद घडीमध्ये शासन प्रत्येक परीने शोकाकुल कुटुंबियांच्या पाठीशी आहे.

गुजरात सरकार काल संध्याकाळपासून संपूर्ण ताकदीने मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहे. केंद्र सरकारकडून राज्य सरकारलाही पूर्ण मदत केली जात आहे. बचाव कार्यात एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे. लष्कर आणि हवाई दलही मदतकार्यात गुंतले आहेत. जे लोक रुग्णालयात उपचार घेत आहेत, तिथेही पूर्ण सतर्कता आहे. मी देशातील जनतेला आश्वासन देतो की, मदत आणि बचाव कार्यात कोणतीही कमी पडणार नाही.

राजधानी दिल्लीतील कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह आदी सहभागी झाले होते. यानिमित्त मेजर ध्यानचंद मैदानापासून राष्ट्रीय एकता दौड आयोजित करण्यात आली. संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी पटेल यांच्या प्रतिमेस हार अर्पण केला. संरक्षणमंत्री राजनाथसिंह, वाणिज्य व वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनीही पुष्पांजली अर्पण केली.

या कार्यक्रमात देशभरातील राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील शाळा आणि महाविद्यालयांमधून निवडलेले ७५ तरुण उपस्थित होते. त्यातील ३० जणांनी ‘‘राष्ट्र उभारणीत सरदार पटेल यांचे योगदान' या विषयावर भाषणे केली.

सरदार पटेल हे भारतीयांचे नायक आहेत असे सांगून बिर्ला म्हणाले की भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्यानंतरच्या राष्ट्र उभारणीत सरदार पटेलांची भूमिका अविस्मरणीय आहे. आधुनिक भारताच्या घडणीत त्यांनी दिलेले महत्त्वपूर्ण योगदान सदैव स्मरणात राहील आणि सशक्त राज्यघटना निर्माण करण्यातील त्यांची भूमिकाही कौतुकास्पद आहे.

पटेल वचनबद्धता, भक्ती आणि दृढनिश्चयाचे प्रतीक होते. त्यांनी भारतातील तरुणांना आवाहन केले की, त्यांचा प्रत्येक विचार आणि कृती देश आणि जगाला समृद्धीकडे घेऊन जाईल असे प्रधान यांनी सांगितले.

"मी आज एकता नगरमध्ये आहे. पण माझे मन ‘मोरबी‘तील पीडितांशी जोडलेले आहे. कर्तव्यपथावरील जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मी तुमच्यामध्ये आहे. मात्र करुणेने भरलेले हृदय मोरबीतील त्या दुःखी कुटुंबांमध्ये आहे ज्यांनी आपल्या प्रिय आप्तांना गमावले, अशा शब्दात पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT