Jyotiraditya Scindia, Abhinay Reddy
Jyotiraditya Scindia, Abhinay Reddy Sarkarnama
देश

आमदारपुत्राच्या प्रतापाची ज्योतिरादित्य शिंदेंकडून दखल; कारवाईचा दिला इशारा

सरकारनामा ब्युरो

तिरूपती : मंत्र्यांच्या स्वागतासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Airport) गेलेल्या आमदारपुत्राला आतमध्ये येण्यास मज्जाव केल्यानंतर त्याने थेट विमानतळाचा पाणीपुरवठाच तोडल्याचा प्रकार समोर आला आहे. आमदारपुत्राचा हा प्रताप थेट नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांच्यापर्यंत पोहचला आहे. शिंदे यांनीही या प्रकाराची दखल घेत चौकशी करून कारवाईचा इशारा दिला आहे.

आंध्र प्रदेशमधील (Andhra Pradseh) वायएसआरसीपी (YSRCP) पक्षाचे आमदार करूणाकर रेड्डी (Karunakar Reddy) यांचा मुलगा अभिनय रेड्डी (Abhinay Reddy) यांच्यावर हे आरोप होत आहेत. ते तिरूपतीचे उपमहापौरही आहेत. यावरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या पुत्राच्या प्रतापावर प्रशासनाने पांघरूण घातले आहे. पण भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आले. भाजपचे खासदार जी. व्ही. एल. नरसिंह राव यांनी शिंदे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

शिंदे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. याबाबतचे ट्विट त्यांनी केले असून कारवाईचा इशारा दिला आहे. या प्रकाराची चौकशी करून आवश्यक कारवाई केली आहे. विमानतळावरील प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असं शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

नेमकं काय घडलं?

तिरुपतीमध्ये रेनिगुंटा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (Renigunta International Airport) व्यवस्थापक सुनिल व अभिनय यांच्यात वाद झाला होता. या आठवड्याच्या सुरूवातीला अभिनय हे आंध्र प्रदेशचे मंत्री बोत्सा सत्यनारायण यांच्या स्वागतासाठी विमानतळावर गेले होते. विमानतळाचे व्यवस्थापक सुनिल यांनी अभिनय व त्यांच्या सहकाऱ्यांना विमानतळावर येण्यास अटकाव केला. त्यावरून विमानतळावरच जोरदार वाद झाला होता. त्यानंतर विमानतळ व कर्मचाऱ्यांच्या वसाहतीचा पाणीपुरवठाच बंद झाल्याचे निदर्शनास आले. अभिनय रेड्डी यांनीच राग आल्याने पाणीपुरवठा बंद केल्याचा आरोप केला जात आहे. पण तिरूपती महापालिका प्रशासनाने पाईपलाईमधील ब्लॉकेजमुळे पाणीपुरवठा बंद झाल्याचा दावा केला आहे.

अभिनय रेड्डी यांनी विमानतळाच्या अधिकाऱ्यांची योग्य वागणूक दिली नाही, असा आरोप केला नाही. राज्याचे मंत्री येणार असूनही त्यांनी प्रोटोकॉलचे पालन केले नाही, असं त्यांनी सांगितले. विमानतळ अधिकारी व महापालिका प्रशासनाने या वादावर बोलण्यास नकार दिला आहे. या प्रकारानंतर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या तेलगू देसमने सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली आहे. टीडीपीचे सरचिटणीस नारा लोकेश म्हणाले, विमानतळ व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचा पाणीपुरवठा बंद करणे म्हणजे सत्ताधारी वायएसआरच्या अराजक कारभाराचा पुरावाच आहे. या घटनेचा तीव्र निषेध करत आहे, असं ट्विट लोकेश यांनी केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT