Mamata Banerjee uddhav Thackeray and KCR
Mamata Banerjee uddhav Thackeray and KCR  Sarkarnama
देश

ठाकरेंच्या रुपाने महाराष्ट्राला पंतप्रधान पदाचा मान? २ मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

सरकारनामा ब्युरो

मुंबई : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर (KCR) यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. दोघांमध्ये वर्षा बंगल्यावर तब्बल अडीच तास चर्चा झाली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली. उद्धव ठाकरेंशी बोलून प्रसन्न वाटलं. देशाचे राजकारण, देशाच्या विकासाची गती, स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर देशाची अवस्था अशा वेगवेगळ्या मुद्यांवर चर्चा झाली आणि जवळपास सर्वच विषयांवर सहमतीही झाली, असे मुख्यमंत्री केसीआर यांनी सांगितले. केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपविरोधात तिसरी आघाडी निर्माण करण्याचे संकेत नुकतेच केसीआर यांनी दिले होते. या पत्रकार परिषदेतही त्यांनी याचेच संकेत दिले आहेत.

केसीआर पुढे म्हणाले, लवकरच हैदराबादमध्ये किंवा इतर ठिकाणी आम्ही सर्व जण भेटू आणि पुढील दिशा ठरवू. पण एक आंदोलन नक्की उभे करु. देशाला बदलाची गरज आहे. देशातील वातावरणाला खराब होवू द्यायचं नाही. अन्य लोकांशीही आम्ही बोलू. पण महाराष्ट्रातून ज्या आंदोलनाची सुरुवात होते त्याचा शेवट यशस्वीच असतो असे त्यांनी सांगत छत्रपती शिवाजी महाराजाच्या लढ्याचा संदर्भही दिला. एकूणच केंद्रातून भाजपला सत्तेतून घालवण्याच्या आंदोलनाची सुरुवात महाराष्ट्रातून झाली असल्याचे संकेत त्यांनी आज दिले. तसेच केसीआर यांच्या भेटीनंतर आता या लढाईचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे येणार का असा चर्चांना उधाण आले आहे.

कारण यापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील महाराष्ट्रात आल्या होत्या. यावेळी उद्धव ठाकरे आजारी असल्याने त्यांची भेट होवू शकली नव्हती. मात्र त्याऐवजी ममता यांनी शिवसेना नेते संजय राऊत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी देखील भाजपविरोधात आघाडी करण्यासाठी प्रयत्न करणार असून त्यासाठी सर्व नेत्यांना भेटणार असल्याचे सांगितले होते. याची सुरुवात महाराष्ट्रातून केली असल्याचे त्या म्हणाल्या होत्या. सत्ता, पैसा व केंद्रीय तपास यंत्रणांचा पश्चिम बंगाल भाजपकडून दुरुपयोग होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

यापूर्वी शिवसेनेने देखील उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान पदाबद्दलचा आशावाद बोलून दाखवला आहे. खासदार संजय राऊत यांनी आगामी काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देशाचे पंतप्रधान होणार असल्याचा दावा काही दिवसांपूर्वी केला होता. तसेच भविष्यात ज्या घडामोडी घडतील त्याच्या भूकंपाचं केंद्रबिंदू शिवेसेना भवन असेल, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला होता. अशातच आता ममता बॅनर्जी आणि केसीआर यांच्या भेटीने पुन्हा एकदा संजय राऊत यांचे हे विधान पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्याला आता महाराष्ट्रातून ज्या आंदोलनाची सुरुवात होते त्याचा शेवट यशस्वीच असतो अशा विधानाचीही जोड दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT