Aditi Singh News Updates
Aditi Singh News Updates  Sarkarnama
देश

असंही राजकारण; पत्नी भाजपमध्ये गेल्यानं काँग्रेसच्या आमदाराचा पत्ता कट?

सरकारनामा ब्युरो

लखनौ : उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुकीमळे (Assembly Election) राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसला (Congress) पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या रायबरेली (Rae Bareli) मतदारसंघातच मोठा धक्का बसला होता. तेथील काँग्रेस आमदार आदिती सिंह (Aditi Singh) या भाजपमध्ये (BJP) मैदानात उतरल्या आहेत. परंतु, यामुळे काँग्रेसमध्ये असलेल्या त्यांच्या पतीचे तिकीट आता अडकले आहे. (Aditi Singh News Updates)

रायबरेलीतील आमदार आदिती सिंह या भाजपच्या गोटात सामील झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीआधी हा काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. आदिती सिंह यांनी थेट पक्षाच्या नेत्या प्रियांका गांधी यांच्यावरच हल्लाबोल केला होता. आदिती सिंह यांना मागील वर्षी पक्षाच्या महिला आघाडीतून डच्चू देण्यात आला होता. तेव्हापासून त्या पक्ष नेतृत्वावर नाराज होत्या. आता त्या भाजपकडून रायबरेलीच्या उमेदवार आहेत.

आदिती सिंह या भाजपमध्ये गेल्या असल्या तरी त्याचा फटका त्यांच्या पतीला बसू लागला आहे. त्यांचे पती अंगदसिंग (Angad Singh) हे पंजाबमधील काँग्रेसचे आमदार आहेत. ते नवांशहर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. काँग्रेसने नुकतीच पंजाबमध्ये 86 उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र, यात अंगदसिंग यांचे नाव नव्हते. त्यांना तिकीट न मिळण्यामागे त्यांच्या पत्नी आमदार आदिती सिंह यांचा भाजपप्रवेश हे कारण असल्याची चर्चा आहे. याचबरोबर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी अंगदसिंग यांना तिकीट देण्यास विरोध केल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, पंजाबमधील काँग्रेस नेत्यांनी आता यातून मार्ग काढण्यासाठी अंगदसिंग यांच्या परिवारातील व्यक्तीला तिकीट मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कारण मागील अनेक दशकांपासून त्यांचा परिवार काँग्रेसशी जोडलेला आहे. त्यांच्या कुटुंबातील अनेक जण आमदार होते. त्यांचे आजोबा दिलबागसिंग हे कृषिमंत्री होते. यामुळे आता अंगदसिंग यांच्या मातोश्री गुरइकबाल कौर यांना तिकीट देण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. यावर पक्षनेतृत्वाकडून विचार सुरू आहे.

रायबरेली हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. सध्या या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सोनिया गांधी करीत आहेत. हा लोकसभा मतदारसंघ 1980 पासून काँग्रेसने ताब्यात ठेवला आहे. फक्त 1996 आणि 1998 चा अपवाद त्यात होता. त्यावेळी भाजपचे अशोक सिंह विजयी झाले होते. रायबरेली विधानसभा मतदारसंघ मागील 6 निवडणुकांपैकी 4 वेळा काँग्रेसच्या ताब्यात राहिला आहे. दोन वेळा म्हणजेच 2007 आणि 2012 मध्ये पक्षातून हकालपट्टी झालेले अखिलेश कुमार सिंह यांनी तेथून विजय मिळवला होता. आदिती या अखिलेश कुमार सिंह यांच्या कन्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT