B.S. Yediyurappa and son B.Y.
Vijayendra
B.S. Yediyurappa and son B.Y. Vijayendra  Sarkarnama
देश

भाजपनं तिकीट नाकारताच येडियुरप्पांच्या पुत्राचा सूचक संदेश; म्हणाले...

सरकारनामा ब्युरो

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) विधान परिषदेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकींसाठी भाजप (BJP) नेतृत्वाने उमेदवारांची जाहीर केली आहे. यात माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांचे पुत्र व भाजपचे उपाध्यक्ष बी.वाय.विजयेंद्र (B.Y.Vijayendra) यांनाच तिकीट नाकारण्यात आले आहे. यानंतर भाजपमध्येच वाद उफाळून आला असून, विजयेंद्र यांनी थेट कार्यकर्त्यांना संदेश दिला आहे. (B. S. Yediyurappa News)

विजयेंद्र यांना तिकीट नाकारण्यात आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कारण राज्याच्या कोअर समितीने त्यांचे नाव सुचवले होते. विजयेंद्र यांची उमेदवारी कापण्यात आल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी भाजप नेतृत्वावर हल्लाबोल केला आहे. यानंतर विजयेंद्र यांनी कार्यकर्त्यांना संदेश दिला आहे. सत्ता आणि पदे ही राजकारणात कायमची नसतात, असे सूचक संदेश त्यांनी दिला आहे. येडियुरप्पा आणि माझ्या भावनांचा विचार करून कार्यकर्त्यांनी पक्षावर टीका करू नये, असे आवाहनही त्यांनी केलं आहे. पक्षासाठी योगदान देणाऱ्यांना पक्ष डावलणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

कर्नाटकात विधान परिषदेच्या सात जागांसाठी 3 जूनला निवडणूक होत आहे. यातील चार जागांवर भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे. या निवडणुकीसाठी भाजपनं उमेदवारी यादी जाहीर केली असून, यात माजी उपमुख्यमंत्री लक्ष्ण सवदी, पक्षाच्या सरचिटणीस हेमलता नायक, भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष चलवादी नारायणस्वामी आणि एस.केशवप्रसाद यांचा समावेश आहे. मात्र, यात येडियुरप्पांचे पुत्र विजयेंद्र यांचे नाव नाही. मागील काही दिवसांपासून विजयेंद्र यांच्या नावाची चर्चा सुरू होती. पण ऐनवेळी पक्ष नेतृत्वाने त्यांना तिकीट नाकारून येडियुरप्पांनाच धक्का दिला आहे. विशेष म्हणजे, भाजपच्या कोअर समितीने विजयेंद्र यांच्या नावाची शिफारसही करून त्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहेत.

येडियुरप्पांनी मागील वर्षी जुलै महिन्यात मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या राजकीय पुनर्वसनाचा मोठा प्रश्न भाजप नेतृत्वासमोर आहे. येडियुरप्पांना त्यांचे पुत्र व पक्षाचे उपाध्यक्ष बी.वाय.विजयेंद्र यांच्यामुळे राजीनामा द्यावा लागल्याची चर्चा होती. तसेच, विजयेंद्र यांना नव्या मंत्रिमंडळातही स्थान देण्यात आले नव्हते. येडियुरप्पांनी आग्रह धरूनही नेतृत्वाने विजयेंद्र यांना डावलले होते. आता विधान परिषदेचं तिकीटही त्यांना नाकारण्यात आलं आहे. यामुळे येडियुरप्पा नाराज असल्याची चर्चा आहे. यामुळे पक्ष नेतृत्वाची डोकेदुखी वाढली आहे.

येडियुरप्पांच्या रुपाने दक्षिणेत भाजपचा पहिला मुख्यमंत्री झाला होता. येडियुरप्पांची मुख्यमंत्रिपदाची ही चौथी टर्म होती. त्यांच्या चौथ्या टर्ममधील मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा केली होती. त्यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी बोम्मई यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. बोम्मई हे येडियुरप्पा यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. येडियुरप्पा यांच्या संमतीनेच त्यांची निवड झाली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT