Suvendu Adhikari
Suvendu Adhikari Sarkarnama
देश

वाद पेटला! विधानसभेतून निलंबित होताच विरोधी पक्षनेते म्हणाले...

सरकारनामा ब्युरो

कोलकता : पश्चिम बंगालच्या विधानसभेत सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजपचे आमदार सभागृहात आमनेसामने आले होते. आमदारांनी एकमेकांना धक्काबुक्की करण्यासोबत हाणामारी केल्याचा प्रकार घडला होता. यानंतर विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्यासह भाजपच्या पाच आमदारांना निलंबित करण्यात आले आहे. राज्य सरकारने आणीबाणीसारखी परिस्थिती लादली असून, त्याविरोधात लढण्याचा निर्धार अधिकारींनी केला आहे.

सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांनी राज्यातील ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेवरून सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, राज्यात आणीबाणीसारखी स्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्र्यांना सातत्याने विरोधकांचा सामना करावा लागत आहे. असे पहिल्यांदाच घडत असल्याने त्या भयगंडाने ग्रस्त आहेत. त्यामुळे त्या विरोधकांनी मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. राज्यातील ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेवर चर्चा करण्यासाठी आम्ही विधानसभेत चर्चा करण्याची मागणी केली होती. सरकारने आमची मागणी फेटाळून लावली. याचवेळी आम्हाला रोखण्यासाठी सरकारने साध्या वेशातील कोलकता पोलिसांना सभागृहात आणण्यात आले. आमच्या 8 ते 10 आमदारांना सभागृहातच मारहाण करण्यात आली. यात आमचे मुख्य प्रतोद मनोज तिग्गा यांचाही समावेश आहे. यामुळे आमदार आता विधानसभेत सुरक्षित नसल्याचे सिद्ध झाले आहे.

वीरभूममधील हिंसाचारावरुन सत्ताधारी आणि विरोधक विधानसभेत 28 मार्चला आमनेसामने आले होते. कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उत्तर द्यावे, अशी मागणी भाजप (BJP) आमदारांनी सभागृहात लावून धरली होती. यामुळे विधानसभेत गोंधळ उडाला होता. यावर तृणमूल काँग्रेसचे (TMC) आमदारही आक्रमक झाले होते. यामुळे सत्ताधारी आणि विरोधी आमदारांमध्ये हाणामारी सुरू झाली होती. हा प्रकार रोखण्यासाठी अखेर मार्शल आणि पोलीस अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. यात तृणमूलचे आमदार असित मुजुमदार यांच्या नाकाला दुखापत झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी सुवेंदू अधिकारींसह पाच आमदारांनी अधिवेशन काळासाठी निलंबित करण्यात आले.

वीरभूममध्ये नेमकं काय घडलं?

रामपूरहाट जवळील बोगटुई गावात जमावाने काही घरांना आग लावली होती. घरांना बाहेरुन कड्या लावून ही आग लावण्यात आली होती. यात 8 जणांचा मृत्यू झाला होता. त्यात 5 महिला आणि 2 लहान मुलांचा समावेश होता. ही घटना 22 मार्चला घडली होती. तृणमूल काँग्रेसचे स्थानिक नेते भादू शेख यांची गावठी बॉम्बने हल्ला करून हत्या झाली होती. याचा सूड उगवण्यासाठी रामपूरहाटमध्ये हिंसाचार करण्यात आल्याचे समोर येत आहे. या हिंसाचारात ठार झालेले सर्व एकाच कुटुंबातील होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT