PM Narendra Modi
PM Narendra Modi 
देश

चिपी विमानतळाची थेट पंतप्रधान मोदींनी घेतली दखल अन् म्हणाले...

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : राजकीय जुगलबंदीच्या नाट्याने शनिवारी कोकणातील पहिल्या विमानतळाचे उद्घटान करण्यात आले. विमानतळाचे श्रेय कुणाचे यापासून ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना आमंत्रण नाही, प्रोटोकॉल अशा अनेक मुद्यांवरून शाब्दीक चकमक उडाली. पण हा वाद बाजूला केल्यास हे सिंधुदूर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील चिपी विमानतळ (Chipi Airport) कोकणवासियांसाठी किती महत्वाचे आहे, हे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी या विमानतळाची दखल घेतल्यानं स्पष्ट झालं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची दखल घेतली आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी शनिवारी आपल्या ट्विटरवरून सिंधुदूर्ग ते मुंबई विमानसेवा सुरू झाल्याची घोषणा केली. त्यानंतर काही वेळातच पंतप्रधान मोदी यांनी शिंदे यांचे ट्विट शेअर करत कोकणवासियांना हे विमानतळ सुरू झाल्याच्या शुभेच्छा दिल्या आहे.

'कोकणवासियांसाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. चिपी विमानतळामुळे हवाई जोडणी आणि पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल', अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी शुभेच्छा दिल्या आहेत. पण या ट्विटमध्ये पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे किंवा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा नावाचा उल्लेख टाळला.

दरम्यान, चिपी विमानताळाच्या श्रेयावरून शिवसेना आणि राणे यांच्यात वाद रंगलेला असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीतच त्यावर आपल्या शैलीत भाष्य केले. सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळ होण्यामागे अनेकांचे योगदान आहे. प्रत्येक पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी पुढे येऊन हा प्रकल्प पूर्ण केला आहे, त्यामुळे याचे श्रेय कोणा एकट्याला जात नाही, अशा शब्दांत त्यांनी शिवसेना-राणे यांच्या श्रेयवादावर भाष्य केले.

चिपी विमानतळाच्या श्रेयावरून शिवसेना आणि नारायण राणे यांच्यामध्ये चांगलाच वाद रंगला होता. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन विमानतळासाठी आपण कसे प्रयत्न केले होते, हे सांगितले होते. ते सांगताना त्यांनी नेहमीप्रमाणे शिवसेनेवर हल्लाबोल केला होता. आजच्या कार्यक्रमात त्यांनी त्यावर भाष्य केले होते. शिवसेनेकडून खासदार विनायक राऊत यांच्यासह अनेकांनी हे विमानतळ शिवसेनेमुळे झाल्याचा दावा केला होता. त्यावर वादावरच मुख्यमंत्री ठाकरे आणि केंद्रीय मंत्री राणे यांच्यासमोरच विमानतळ उदघाटनाच्या कार्यक्रमात सुनावले.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, “गोव्याचे नवीन विमानतळ झाले तरी सिंधुदुर्ग विमानतळामुळे जिल्ह्याचा आणि पर्यायाने कोकणचा विकास होणार आहे. त्यादृष्टीने चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न करा. रत्नागिरीपासून रायगडपर्यंत पुढे जाणारा हायवे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर सिंधुदुर्ग विमानतळाचा रनवे वाढविण्यासाठी प्रयत्न केला जावा. गोव्याइतकेच चांगले समुद्रकिनारे सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभले आहेत. त्यात सिंधुदुर्ग विमानतळाने जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी आणखी भर घातली आहे. त्याचा फायदा येथील लोकांना होईल.’’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT