amarinder singh says will decide future after talking with supporters
amarinder singh says will decide future after talking with supporters 
देश

मुख्यमंत्रिपदानंतर आता काँग्रेसही सोडणार का? यावर अमरिंदरसिंग म्हणाले...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांना राजीनामा दिला आहे. नवीन मुख्यमंत्री  निवडीसाठी काँग्रेस (Congress) हाय कमांडने तातडीने आज सायंकाळी आमदारांची बैठक बोलावली आहे. दरम्यान, राजीनामा दिल्यानंतर अमरिंदरसिंग यांनी मनातील खदखद व्यक्त करीत भविष्यात वेगळा निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत. 

अमरिंदरसिंग यांनी आज राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला. यानंतर बोलताना अमरिंदरसिंग म्हणाले की, पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी आज सकाळी चर्चा केल्यानंतर मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे आमदारांची बैठक बोलावून माझा अपमान करण्याची ही तिसरी वेळ आहे. ते त्यांच्या विश्वासातील व्यक्तीला आता मुख्यमंत्री नेमू शकतात. काँग्रेस अध्यक्षा जो निर्णय घेतील तो चांगला असेल. मी सध्या तरी काँग्रेससोबत आहे. मी समर्थकांशी चर्चा करुन भविष्यातील निर्णय घेईन. 

आमदारांच्या तातडीच्या बैठकीबाबत पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत यांनी ट्विट केले आहे. पक्षाच्या अनेक आमदारांनी तातडीने बैठक बोलावण्याची मागणी केली होती. यानुसार आज सायंकाळी ही बैठक होत आहे. पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीने ही सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला सर्व आमदारांनी उपस्थित राहावे, असे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसने अचानक बैठक बोलावल्याने राज्यात मुख्यमंत्री बदल होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

पक्षाच्या अनेक आमदारांनी अमरिंदरसिंगांनी बदलण्याची मागणी लावून धरली होती. त्यांचे वारंवार पक्ष नेतृत्वाशीही खटके उडू लागले होते. पुढील वर्षी राज्यात विधानसभा निवडणूक होत असल्याने पक्ष नेतृत्वाला लवकरात लवकर या वादावर तोडगा काढायचा आहे. आजच्या बैठकीत नवीन मुख्यमंत्री निवडला जाणार आहे. यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाची बढती मिळताच त्यांनी पुन्हा आमदारांना हाताशी धरुन मुख्यमंत्र्यांविरोधात कुरघोड्या सुरू केल्या. परंतु, काँग्रेस हाय कमांडने अमरिंदर हेच राज्यात कॅप्टन असतील, हे स्पष्ट केले होते. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री आणि सिद्धू यांच्या वादावर पडदा पडला होता. पण पुन्हा एकदा सिद्धू यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात मोर्चा उघडला आहे. पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. या पार्श्वभूमीवर हा वाद निर्माण झाल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. आता यावर सोनिया गांधी आणि राहुल गांधी काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे. 

अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात मागील 2017 च्या विधानसभा निवडणुकीपासून वाद सुरू आहे. भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या सिद्धू यांनी काँग्रेसच्या विजयानंतर पंजाबमध्ये उपमुख्यमंत्रिपद मिळेल, अशी शक्यता होती. परंतु, अमरिंदरसिंग यांनी याला विरोध केल्याने सिद्धू यांना दुसरे मंत्रालय देण्यात आले होते. तेव्हापासून दोघांचा वाद सुरू असून, सिद्धू यांनी उघड बंड पुकारले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT