Jagan Mohan Reddy
Jagan Mohan Reddy Sarkarnama
देश

Breaking : जगनमोहन यांनी करून दाखवलं; मंत्रिमंडळ बैठकीनंतर सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेतले

सरकारनामा ब्युरो

अमरावती (आंध्र प्रदेश) : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांनी गुरूवारी सर्वांनाच धक्का दिला. मंत्रिमंडळ बैठकीनंतर त्यांनी मंत्रिमंडळातील सर्वच मंत्र्याचा राजीनामा घेतला. काही प्रमुख नेत्यांना वगळता ते 24 पैकी सुमारे 19 मंत्र्याचा राजीनामा घेतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण त्यांनी सर्वांचाच राजीनामा घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर जगनमोहन यांनी दिलेला शब्द करून दाखवला आहे. मंत्रिमंडळात नेत्यांचा समावेश करताना त्यांनी हे मंत्रिमंडळ दोन ते अडीच वर्षांचेच असेल, असं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर इतर आमदारांना संधी दिली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानुसार गुरूवारी त्यांनी सध्याच्या मंत्रिमंडळाची शेवटची बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी सर्वच मंत्र्याचे राजीनामे घेतले. त्यानुसार त्यांनी आपला शब्द खरा करून दाखवत इतर आमदारांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे इतर मतदारसंघांनाही न्याय मिळणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

आगामी विधानसभा (Assembly Election) व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेड्डी यांच्याकडून संपूर्ण मंत्रिमंडळाचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची चर्चा काही दिवस सुरू होती. जगनमोहन रेड्डी यांनी दिल्ली दौऱ्यावरून आल्यानंतर बुधवारीच राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन यांची विजयवाडा येथे राज भवनात भेट घेतली. मंत्रिमंडळ (Cabinet) बदलाबाबत त्यांनी राज्यपालांना माहिती दिली होती. आता मंत्र्यांचे राजीनामे त्यांच्याकडे सोपवले जातील.

नवीन मंत्र्यांच्या नावांची अंतिम यादीही राज्यपालांना आजच दिली जाण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह 26 मंत्र्यांचा समावेश आहे. येत्या 9 किंवा 11 एप्रिल रोजी नव्या मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. हे बदल डिसेंबर 2021 मध्येच होणार होते. पण कोरोनामुळे लांबणीवर पडले. अखेर जगनमोहन यांनी शेवटची बैठक घेतल्यानंतर राजीनाम्यांवर आजच शिक्कामोर्तब केलं.

मंत्रिमंडळातून डच्चू दिलेल्या नेत्यांना पक्ष संघटनेच्या बळकटीसाठी वापर केला जाणार आहे. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळातील फेरबदल केले जाणार आहे. त्यामुळे जातीय समीकरणांचा विचार करून आमदारांना संधी दिली जाईल. पक्षाला मागील निवडणुकीत 175 पैकी 151 जागांवर विजय मिळवून एकहाती सत्ता मिळाली आहे. तसच नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही पक्षाला मोठा विजय मिळाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT