Assembly Session
Assembly Session Sarkarnama
देश

अशीही खेळी! आता विधानसभेत आमदारांचं होणार आपोआप निलंबन

सरकारनामा ब्युरो

अमरावती : विधानसभेच्या अधिवेशनात (Assembly Session) आता सरकारने नवीन खेळी खेळून विरोधकांची कोंडी केली आहे. विषारी दारूकांड प्रकरणी विधिमंडळात गोंधळ घालणाऱ्या तेलगू देसम पक्षाच्या (TDP) 16 आमदारांना निलंबित करण्यात आले आहे. यानंतर सरकारने आमदारांचे आपोआप निलंबन होईल, असा नवीन नियमच लागू केला आहे. यासाठी सरकारने आमदाराच्या बेशिस्तीचे कारण दिले आहे. यावरुन आता सत्ताधारी वायएसआर काँग्रेस (YSR Congress) विरुद्ध टीडीपीमध्ये जुंपली आहे.

आता सरकारचे मुख्य प्रतोद गाडीकोटा श्रीकांत रेड्डी यांनी आमदारांच्या निलंबनाबाबत नवा प्रस्ताव मांडला. यानुसार, सभागृहात तीन रंगाच्या रेषा आखण्यात येतील. पांढऱ्या, लाल आणि हिरव्या रंगाच्या या रेषा असतील. या रेषा पार करणाऱ्या आमदारांचे आपोआप निलंबन होईल. या प्रस्तावाला सभागृहाने मंजुरी दिली आहे. हा प्रस्ताव आता विधानसभा अध्यक्ष तम्मिनेनी सीताराम यांनी नियम समितीकडे पाठवला आहे. याआधी टीडीपीचे सरकार असताना तत्कालीन मंत्री यानामला रामकृष्णूडू यांनीही असाच प्रस्ताव तयार केला होता. सभागृहात शिस्तबद्धता आणण्यासाठी हा नवा नियम लागू करण्यात येणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे.

विषारू दारूकांड प्रकरणावरून विधानसभेत गदारोळ घालणाऱ्या टीडीपीच्या 5 आमदारांना दोनच दिवसांपूर्वी निलंबित करण्यात आले होते. आजही विरोधी पक्षाच्या सदस्यांनी यावर चर्चेसाठी विधानसभेचे कामकाज रोखून धरले.यामुळे उपमुख्यमंत्री नारायणस्वामी यांनी टीडीपीच्या 11 आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर झाला. यानंतर विधानसभा अध्यक्ष तम्मिनेनी सीताराम यांनी टीडीपीच्या 11 आमदारांना एक दिवसासाठी निलंबित केल्याचे जाहीर केले. अशोक बेंदालम, आदिरेड्डी भवानी, निम्मकायला चिनाराजप्पा, गणाबाबू, भोगेश्वर राव, रामकृष्ण बाबू, रामराजू, गोट्टीपटी रवी, येलुरी संबाशिव राव, गड्डे राम मोहन आणि सत्यप्रसाद या आमदारांचा यात समावेश आहे.

आंध्र प्रदेशच्या (Andra Pradesh) विधिमंडळात दोन दिवसांपूर्वी चर्चा सुरू असताना टीडीपीच्या सदस्यांनी कामकाजात गोंधळ घातला होता. त्यांनी अर्थसंकल्पावरील चर्चा रोखून धरली होती. जगनारेड्डीगुडेम येथे विषारी ताडी पिऊन झालेल्या मृत्यूंची चर्चा करण्याचा मागणी त्यांनी लावून धरली होती. त्यांनी अध्यक्ष तम्मिनेनी सीताराम यांच्यासमोर धाव घेतली होती. त्यांनी अर्थसंकल्पाची कागदपत्रे फाड़ून सभागृहात भिरकावली होती. यानंतर सभागृहातील परिस्थिती गंभीर बनली होती. अखेर विधानसभा अध्यक्षांनी टीडीपीच्या पाच आमदारांना निलंबित केले होते. यात के. अचननायडू, जी.बुचय्या चौधरी, पाय्यवुला केशव, एन. रामा नायडू आणि डी.बाला वीरांजनेय स्वामी या आमदारांचा समावेश आहे. या आमदारांचे निलंबन अर्थसंकल्पी अधिवेशन संपेपर्यंत कायम राहणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT