Arvind Kejriwal Sarkarnama
देश

Arvind Kejriwal : भाजपचा मला अटक करण्याचा डाव; ईडी चौकशीवर केजरीवालांचे 'इमोशनल कार्ड'

सरकारनामा ब्यूरो

New Delhi News : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून (ED) केजरीवालांना आतापर्यंत तीन समन्स पाठवण्यात आले. केजरीवाल यांनी या तिन्ही समन्सकडे दुर्लक्ष केले होते. जर घोटाळा झाला असेल तर कोट्यवधी रुपये कुठे गेले? असा सवाल करत सर्व समन्स बेकायदा होते, असा पलटवार केजरीवाल यांनी केला आहे. शिवाय भाजपचा हेतू शुद्ध नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

अरविंद केजरीवाल यांनी तीनही समन्सला जुमानले नाही. ईडी समन्सप्रकरणी आज दिल्लीतील राजकारणात काहीतरी घडणार, अशी चर्चा होती. त्यावर केजरीवाल यांनी आज मौन सोडले आहे. 'ईडीचे सर्व समन्स बेकायदा होते, म्हणून प्रतिसाद न दिल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे. एवढेच नाही तर आपण देशभक्तीसाठी लढत आहोत आणि रक्ताचा थेंब न् थेंब देशासाठीच असेल,' असे सांगत त्यांनी भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला.

'जर घोटाळा झाला असेल तर पैसा गेला कुठे? कुठूनच कसे पैसे जप्त झाले नाहीत,' असा सवाल केजरीवाल यांनी केला. 'दोन वर्षांपासून तुम्ही मद्य घोटाळ्याचे नाव ऐकत आहात. दोन वर्षांत भाजपच्या साऱ्या संस्थांनी अनेक ठिकाणी छापे मारले. अनेक लोकांना अटक करण्यात आली. पण कुठेच पैशांची अफरातफर दिसून आली नाही. जर खरेच भ्रष्टाचार झाला असेल तर कोट्यवधी रुपये कुठे गेले? सर्व पैसे काय हवेत गायब झाले का? वास्तव हेच आहे की, कोणत्याच प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही. जर भ्रष्टाचार झाला असता तर पैसेही मिळाले असते,' असे केजरीवाल यांनी ठणकावून सांगितले.

'भाजपला मला अटक करायची आहे. म्हणून केवळ बदनाम करण्यासाठी भाजप बेकायदा समन्स पाठवत आहे,' असा गंभीर आरोप केजरीवाल यांनी केला. एवढेच नाही तर 'माझा प्रामाणिकपणा हीच माझी सर्वात मोठी ताकद, हीच माझी सर्वात मोठी संपत्ती आहे,' असे सांगत 'माझ्या प्रामाणिकपणावर घाव घालण्यासाठी बेकायदा समन्स पाठवले जात आहेत,' असा आरोपही त्यांनी केला. त्याचवेळी कायदेशीर समन्सचे निश्चितच पालन करेन, असेही त्यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आठ महिन्यांपूर्वी सीबीआयने बोलावल्यानंतर मी चौकशीला हजर राहिलो होते. दोन वर्षांपासून चौकशी सुरू आहे. पण मला अटक करून लोकसभा प्रचारापासून दूर ठेवण्याचा हा भाजपचा खटाटोप आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी चौकशीला बोलावणे म्हणजे भाजपचा हेतू स्वच्छ नाही, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

(Edited by Avinash Chandane)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT