Ashish Mishra
Ashish Mishra File Photo
देश

शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या मंत्रिपुत्राची दिवाळीही तुरुंगातच?

सरकारनामा ब्युरो

लखीमपूर खीरी : केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्राने (Ashish Mishra) 3 ऑक्टोबरला लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे शेतकऱ्यांना चिरडले होते. या प्रकरणी आशिष मिश्राला अटक करण्यात आली आहे. तो सध्या जिल्हा कारागृहात आहे. त्याने जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली असून, यावर 3 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. जामीन न मिळाल्यास आशिषची दिवाळी कारागृहातच जाणार आहे.

आशिषच्या जामिनाला पोलिसांनी न्यायालयात विरोध केला. पुरामुळे साक्षी आणि जबाब नोंदवण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. याचबरोबर आशिषची वैद्यकीय तपासणी अहवाल कारागृह प्रशासनाकडून अद्याप मिळालेला नाही. यामुळे सरकारी पक्षाला केस डायरी सादर करण्यासाठी काही कालावधी द्यावा, अशी विनंतीही पोलिसांनी न्यायालयाला केली. न्यायालयाने या प्रकरणी पुढील सुनावणी 3 नोव्हेंबरला ठेवली आहे. त्यावेळीच आशिषच्या जामिनावर निर्णय होणार आहे.

आशिषने 21 ऑक्टोबरला जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. या प्रकरणात आतापर्यंत १३ जणांना अटक केली आहे. यात आशिष मिश्रासह सुमित जयस्वाल, अंकित दास, लतिफ ऊर्फ काले, शेखर भारती, शिशू पाल, सत्य प्रकाश त्रिपाठी, नंदनसिंह बिश्त, आशिष पांडे, लवकुश राणा, मोहित त्रिवेदी, रांकू राणा आणि धर्मेंद्र यांचा समावेश आहे. या दहा जणांना अटक झाली आहे. आशिष पांडे आणि लवकुश राणा हे दोघे वगळता इतर सर्व आरोपी पोलीस कोठडीत आहे.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेली वर्षभरापासून शेतकरी शांततामय मार्गाने आंदोलन करीत आहेत. लखीमपूर खीरी येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे 3 ऑक्टोबरला गेले होते. त्यावेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री मिश्रा यांचा मुलगा आशिष आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली होती. याचवेळी ही घटना घडली होती. यात 8 जणांचा मृत्यू झाला असून, त्यातील 4 शेतकरी आहेत.

मिश्रा आणि मौर्य यांच्या मोटारींचा ताफा 3 ऑक्टोबरला तिकोनिया चौकातून जात असताना त्यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी शेतकरी धावले. त्याचवेळी ताफ्यातील दोन मोटारी त्या गर्दीत घुसल्या. त्यामुळे अनेक शेतकरी चिरडले गेले. ही घटना पाहताच शेतकरी आणखी संतप्त झाले. आंदोलक शेतकऱ्यांनी त्या दोन्ही गाड्यांना आग लावल्याचे सांगण्यात येते. या घटनेत एकूण आठ जणांचा मृत्यू झाला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT