Banwarilal Purohit Sarkarnama
देश

Banwarilal Purohit Resigns : बनवारीलाल पुरोहित यांचा पंजाबच्या राज्यपालपदाचा राजीनामा ; मुख्यमंत्री मान यांच्याशी सतत सुरु होता संघर्ष...

Amol Sutar

Panjab Political : पंजाबचे राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडचे प्रशासक बनवारीलाल पुरोहित यांनी त्यांच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आजच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. बनवारीलाल यांनी वैयक्तिक कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे राजीनाम्यात नमूद केले आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दिलेल्या राजीनामा पत्रात बनवारीलाल पुरोहित यांनी माझ्या वैयक्तिक कारणांमुळे आणि इतर काही वचनबद्धतेमुळे मी पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगडच्या प्रशासक पदाचा राजीनामा देत आहे. कृपया तो स्वीकारा, असे पत्रात नमूद केले आहे. पुरोहित हे केवळ पंजाबचे राज्यपाल नाहीत तर केंद्रशासित प्रदेश चंदीगडचे प्रशासकही आहेत. 31 ऑगस्ट 2021 रोजी पंजाबचे राज्यपालपद स्वीकारण्यापूर्वी ते आसाम आणि तामिळनाडूचे राज्यपाल होते.

मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याशी वाद...

पंजाबमधील पुरोहित यांच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक वादांना जन्म दिला आणि मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याशी त्यांचा असा संघर्ष झाला की दोघांनाही त्यांच्या हक्कांसाठी सर्वोच्च न्यायालयात जावे लागले. पंजाबमध्ये विधानसभेचे अधिवेशन बोलावणे, विद्यापीठांचे कुलगुरू नियुक्त करणे आणि विधानसभेत मंजूर झालेली विधेयके थांबवणे या मुद्द्यांवरून मुख्यमंत्री मान यांच्याशी बनवारीलाल पुरोहित यांचा बराच वाद झाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या वादात परिस्थिती एवढ्या पातळीवर पोहोचली की सरकारला राज्यपालांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जावे लागले. सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांना आपण निवडून आलेले प्रतिनिधी नसून सरकार चालवणे हे निवडून आलेल्या प्रतिनिधींचे काम आहे, असे सांगितल्यावर अखेर हा वाद शांत झाला आणि विधानसभेचे अधिवेशन बोलावण्यात आले.

नागपूर कनेक्शन...

पुरोहित याआधी आसामचे राज्यपालही होते. 78 वर्षीय बनवारीलाल पुरोहित हे देखील दोनदा काँग्रेसमधून आणि एकदा भाजपच्या तिकिटावर खासदार झाले आहेत. त्यांनी 1977 मध्ये राजकारणात प्रवेश केला. 1978 मध्ये विदर्भ आंदोलन समितीच्या तिकिटावर नागपूर मधून विधानसभा निवडणूक जिंकली. 1980 मध्ये दक्षिण नागपुरातून काँग्रेसचे आमदार झाले.

1984 आणि 1989 मध्ये ते नागपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. 1991 मध्ये त्यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून काँग्रेस सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना 1996 मध्ये तिकीट दिले आणि ते तिसऱ्यांदा खासदार झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT