पाटणा : बिहारमधील भाजप आणि संयुक्त जनता दलाच्या (जेडीयू) सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज झाला. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात नव्याने 17 मंत्र्यांचा समावेश झाला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या मंत्र्यांची संख्या जास्त असली तरी महत्वाची खाती मात्र, जेडीयूकडे राहिली आहेत. यातून राज्यात आपणच मोठा भाऊ असल्याचा संदेश त्यांनी भाजपला दिला आहे.
राज्यपाल फागू चौहान यांनी आज 17 नवीन मंत्र्यांना शपथ दिली. यात भाजपचे 9 आणि जेडीयूचे 8 मंत्री आहेत. यात भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहनवाज हुसेन, प्रमोद कुमार, आलोक रंजन झा, नितीन नवीन, नारायण प्रसाद, नीरजसिंह बबलू, सुभाषसिंह, सम्राट चौधरी, जनक राम यांचा समावेश आहे. जेडीयूच्या मंत्र्यांमध्ये श्रवणकुमार, संजय झा, लेसी सिंह, सुनीलकुमार, जयंत राज, मदन साहनी, सुमितसिंह, जमा खान यांचा समावेश आहे. राज्यातील मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या आता 30 वर गेली असली तरी अद्याप सहा जागा रिकाम्या आहेत.
मंत्रिमंडळ विस्तारात नितीशकुमारांचा दबदबा दिसून आला आहे. आजच्या विस्तारात भाजपच्या मंत्र्यांची संख्या जास्त आहे. परंतु, महत्वाची खाती जेडीयूच्या वाट्याला आली आहेत. यातून राज्यात मोठ्या भावाच्या भूमिकेत जाऊ पाहणाऱ्या भाजपला त्यांनी शह दिला आहे. गृह, मनुष्यबळ, शिक्षण, ग्रामविकास, ग्रामीण कामकाज, जलसंपदा ही महत्वाची खाती जेडीयूकडे राहिली आहेत.
बिहारच्या एकूण मंत्रिमंडळात आता भाजपचे 16 मंत्री असून, त्यांच्याकडे 22 खात्यांचा पदभार आहे. याचवेळी जेडीयूचे 13 मंत्री असून, त्यांच्याकडे 21 खाती आहेत. याचवेळी माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी यांच्या हिंदुस्तान आवाम मोर्चा आणि विकासशील इन्सान पार्टीला प्रत्येकी एक मंत्रिपद मिळाले आहे.
मागील वर्षी राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत जेडीयूचे संख्याबळ 71 वरुन 43 वर आले होते. याचवेळी भाजपने 74 जागा जिंकल्या होत्या. चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षामुळे जेडीयूला फटका बसला होता. त्यावेळी भाजपने संख्याबळ अधिक असूनही नितीशकुमारांकडेच मुख्यमंत्रिपद दिले होते. भाजप राज्यात मोठ्या भावाची भूमिका बजावणार अशी चर्चा सुरू होती. परंतु, नितीशकुमारांनी मंत्रिमंडळ विस्तारात मोठ्या भावाची भूमिका त्यांच्याकडेच राहील, हे भाजपला दाखवून दिले आहे.
नव्या मंत्र्यांमधील प्रथमच मंत्रिमंडळात समावेश झालेले भाजपचे मंत्री अधिक आहेत. भाजपने अधिक नव्या चेहऱ्यांना संधी दिली असून, जेडीयूने मात्र, मागील वेळी मंत्रिमंडळात असलेल्यांना प्राधान्य दिले आहे. नितीश सरकारचा शपथविधी मागील 16 नोव्हेंबरला झाला होता त्यावेळी मुख्यमंत्र्यासोबत 14 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. मात्र, नंतर मेवालाल चौधरी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
अनेक दिवसांपासून राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू होती. मात्र, याला भाजपकडून विलंब लावला जात होता. विस्तारासाठी भाजपकडून नावे दिली जात नसल्याचे खुद्द नितीशकुमारांनी उघड केले होते. यामुळे दोन्ही पक्षांतील मतभेद दूर झाले नसल्याचे समोर आले होते. नितीशकुमार यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात कधीही मंत्रिमंडळ विस्ताराला एवढा कालावधी लागलेला नव्हता. नितीशकुमारांनीच याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी म्हटले होते की, याआधी कधीही मला मंत्रिमंडळ विस्तारास एवढा वेळ लागला नव्हता. आम्ही सुरवातीलाच मंत्रिमंडळ विस्तार करीत होतो.
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.