Bihar Politics  Sarkarnama
देश

Bihar Politics Live: बिहारच्या राजकारणात ट्विस्ट; BJP ने नितीशकुमार यांच्यासमोर ठेवली 'ही' अट

Mangesh Mahale

New Delhi: बिहारमध्ये सुरु असलेल्या राजकीय उलथापालथीत अनेक ट्विस्ट येत आहेत. नितीशकुमार हे आज (रविवारी) सकाळी राजीनामा देतील, त्यानंतर सांयकाळी पुन्हा ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नांना वेग आला आहे. अशा परिस्थितीत भाजपने नितीशकुमार यांच्यासमोर अट ठेवली आहे की आधी तुम्ही राजीनामा द्या, त्यानंतरच भाजप आणि एनडीएतील इतर घटक पक्ष नितीशकुमार यांना पाठिंब्याचे पत्र देतील.

नितीशकुमार यांच्या राजीनाम्यानंतरच एनडीए विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. बैठकीत नितीशकुमार यांची एनडीए विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री आणि जेडीयूप्रमुख नितीशकुमार यांनी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्याकडे वेळ मागितला आहे. नितीशकुमार आज राजीनामा देऊ शकतात आणि संध्याकाळी एनडीएसोबत बिहारमध्ये नवे सरकार स्थापन करू शकतात, असे राजकीय विश्लेषकांनी म्हटलं आहे. तसे झाल्यास ते नवव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे नितीशकुमार हे एकमेव मुख्यमंत्री असतील.राज्यपाल सचिवालयासह कार्यालये रविवारी खुली ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.नितीशकुमार यांनी एनडीएसोबत जाण्याची संपूर्ण रणनीती आखली आहे, पण बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी 'खेळ अजून बाकी आहे' असे विधान केले आहे.

बिहारमधील राजकीय घडामोडींवर नितीशकुमार यांनी मौन बाळगले आहे.त्यांनी काल (शनिवारी) सकाळी पाटण्यातील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर बक्सर जिल्ह्यातील एका प्रसिद्ध मंदिराच्या सुशोभीकरण प्रकल्पाचे उद्घाटन केले. उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या अखत्यारीतील पर्यटन विभागाचा हा प्रकल्प आहे, मात्र तेजस्वी या सोहळ्याला गैरहजर होते.

विविध राजकीय पक्षांच्या बैठकांचा सपाटा सुरू आहे. जेडीयू विधिमंडळ पक्षाची बैठक पाटण्यात होणार आहे, तर राजदने आमदारांना पाटण्यातच राहण्याचे आदेश दिले आहेत. भाजप आज आपल्या खासदार आणि आमदारांसोबत बैठक घेणार आहे, तर दुसरीकडे पूर्णियामध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे, त्यासाठी भूपेश बघेल यांना पर्यवेक्षक म्हणून पाठवण्यात आले आहे.नितीशकुमार हे पुन्हा एनडीएसोबत जाऊ शकतात, अशी अटकळ बांधली जात असतानाच राष्ट्रीय जनता दलाने (राजद) शनिवारी आपल्या नेत्यांसोबत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि पुढील रणनीती आखली. जेडीयूचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते के.सी. त्यागी यांनी बिहारमधील महाआघाडीचे सरकार कोसळण्याच्या मार्गावर असल्याचे स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT