BJP
BJP Sarkarnama
देश

Punjab Election 2022 : भाजपला आताच नकोय विधानसभा निवडणूक! आयोगाकडं घेतली धाव

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतही उमेदवार, कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झालेला नाही. उमेदवारी याद्या जाहीर होत असून बहुतेकांनी प्रचारालाही सुरूवात केली आहे. त्यातच आता पंजाबमधील विधानसभा निवडणुका (Punjab Assembly Election 2022) पुढे ढकलण्याबाबत राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाचा दरवाजा ठोठावला आहे.

पुढील दोन महिन्यांत देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका (Assembly Elections) होत आहेत. देशात कोरोनाची (Covid-19) तिसरी लाट आली असतानाही निवडणूक आयोगाने नियोजित वेळापत्रकानुसार निवडणुका घेण्याची भूमिका घेतली आहे. पण पंजाब (Punjab) मधील प्रमुख राजकीय पक्षांनी ही निवडणूक पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी (Charanjit singh Channi) यांनी शनिवारीच निवडणूक आयोगाला याबाबत पत्र पाठविले आहे.

पंजाबमध्ये 14 फेब्रुवारीला मतदान होत आहे. गुरु रविदास यांची जयंती 16 जानेवारीला आहे. राज्यातील 32 टक्के जनता अनुसूचित जातींमधील आहे. या समाजातील काही प्रतिनिधींनी ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. रविदास जयंतीला राज्यातून लाखो भाविक उत्तर प्रदेशातील बनारसला 10 ते 16 फेब्रुवारीदरम्यान जातात. यामुळे या समाजातील लोक मतदान करू शकणार नाहीत. याचा विचार करून मतदान सहा दिवस पुढे ढकलावे, असं चन्नी यांनी पत्रात म्हटलं आहे.

मुख्यमंत्री चन्नी यांच्या पत्रानंतर आता भाजपलाही (BJP) खडबडून जाग आली आहे. भाजपनंही गुरू रविदास जयंतीचे कारण देत ही निवडणूक पुढे ढकलण्याची विनंती केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. राज्यातील दोन प्रमुख पक्षांनी निवडणूक पुढे ढकलण्याची विनंती केल्याने आयोग यावर काय निर्णय घेणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. कोरोना काळातही आयोगानं निवडणूकची घोषणा केल्याने दोन्ही पक्षांची मागणी आयोग मान्य करणार नाही, अशीच चर्चा आहे.

देशात कोरोनाचा कहर वाढत असतानाच निवडणुकांची रणधुमाळी सुरू असल्याने चिंता व्यक्त होत आहे. यामुळे आयोगाने उत्तर प्रदेशात राजकीय पक्षांशी चर्चा केली होती. त्यावेळी भाजप, काँग्रेससह सर्वच पक्षांनी निवडणुका पुढे ढकलण्यास विरोध केला होता. यामुळे आयोगाने ठरलेल्या वेळापत्रकानुसार निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा (Sushil Chandra) यांनी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशात सात टप्प्यात आणि मणिपूरमध्ये दोन टप्प्यांत तर, पंजाब, उत्तराखंड, गोव्यात एकाच टप्प्यात मतदान होईल.पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची मतमोजणी 10 मार्चला होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT