Tejinder Pal Singh Bagga
Tejinder Pal Singh Bagga  Sarkarnama
देश

हजार गुन्हे दाखल झाले तरी माघार नाही! भाजप नेत्याचं मुख्यमंत्र्यांना खुलं आव्हान

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : दिल्ली भाजपचे नेते तेजिंदर बग्गा (Tajinder Pal Singh Bagga) यांच्या अटकेवरून राजकारण तापलं आहे. त्यांना पंजाब व हरियाना उच्च न्यायालयाने नुकताच दिलासा दिला आहे. यानंतर आता बग्गा यांनी थेट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना खुलं आव्हान दिलं आहे. यावरून आता भाजप (BJP) आणि आम आदमी पक्षामध्ये (AAP) जुंपली आहे.

न्यायालयानं दिलासा दिल्यानंतर बग्गा यांनी आज पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांना लक्ष्य केलं. ते म्हणाले की, माझ्या विरोधात एक अथवा एक हजार खटले दाखल झाले तरी मी केजरीवालांनी प्रश्न विचारणे सोडणार नाही. मला एका दहशतवाद्याप्रमाणे अटक करण्यात आली. गुरूग्रंथसाहिबचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन केजरीवालांनी दिले होते. याबद्दल प्रश्न विचारणे ही माझी चूक आहे का? अमली पदार्थांचे तस्कर आणि फुटिरतावादी खलिस्तानींवर कारवाई करण्याचा शब्दही त्यांनी दिला होता. याबद्दल प्रश्न विचारल्याने माझ्यावरच कारवाई करण्यात आली.

दिल्ली पोलिसांनी 6 मे रोजी पंजाब पोलिसांच्या ताब्यातून बग्गांची नाट्यमयरीत्या सुटका केली होती. त्यांच्या अटकेची मागणी करताना पंजाब पोलिसांनी पुन्हा एक याचिका दाखल केली होती. त्यावर मोहालीचे न्यायदंडाधिकारी रविजेश इंद्रजित सिंह यांनी पुढील सुनावणीवेळी बग्गा यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करावे, असा आदेश पोलिसांना दिला होता. बग्गा यांना आता उच्च न्यायालयाने दिलासा दिल्याने त्यांना पोलिसांना अटक करता येणार नाही.

सोशल मीडियावर चिथावणीखोर पोस्ट करून धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी बग्गा यांच्यावर मोहाली येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात बग्गा यांना उच्च न्यायालयाने 5 जुलैपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. दरम्यान, बग्गा यांना त्यांच्या दिल्लीतील घरातून पंजाब पोलिसांनी 6 मे रोजी सकाळी अटक केली होती. मात्र हरियाना पोलिसांनी त्यांच्या पथकाला रस्त्यातच अडविले.पंजाब व हरियाना उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर दिल्ली पोलिस बग्गा यांना घेऊन काल मध्यरात्री दिल्लीत परतले. बग्गा यांचे दिल्ली भाजपने जोरदार स्वागत केले.

दिल्ली पोलिसांनी बग्गा यांना दिल्लीत आणल्यावर सुरक्षा पुरविली आहे. तेजिंदर यांना खोट्या आरोपांखाली अडकविण्याचा प्रयत्न दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल करत आहेत, असा आरोप बग्गांचे वडील प्रितपालसिंग यांनी केला होता. केजरीवाल सरकार हे शिखविरोधी सरकार असल्याचा आरोपही त्यांनी केला. केजरीवाल यांच्या धमक्यांना भीक घालणार नाही व त्यांच्या हुकूमशाहीविरोधात जाहीर लढा देत राहू असाही इशारा त्यांनी दिला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT