MLA Vinay Shakya
MLA Vinay Shakya  Sarkarnama
देश

तुमचं अपहरण झालंय का? यावर आमदार फक्त हसले...

सरकारनामा ब्युरो

लखनौ : उत्तर प्रदेशातील राजकारण भाजप आमदार विनय शाक्य (Vinay Shakya) यांच्यावरून तापले आहे. ओबीसींचे मातब्बर नेते म्हणून ओळख असलेले स्वामीप्रसाद मौर्य यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर काही तासांतच चार आमदारांनीही राजीनामा दिल्याने राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. दरम्यान, यातील आमदार विनय शाक्य यांचे अपहरण करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. यानंतर शाक्य माध्यमांसमोर आले असून, त्यांनी याबाबत खुलासा केला आहे.

मौर्य यांच्यासोबत आमदार विनय शाक्य यांनीही भाजप सोडल्याचा दावा करण्यात आला होता. ते बिधुना मतदारसंघाचे आमदार आहेत. विनय आणि त्यांचे बंधू देवेश शाक्य हे दोघेही मौर्य यांचे निकटवर्ती मानले जातात. त्यांच्या मुलीने आपल्या पित्याचे अपहरण करून त्यांना भाजप सोडायला लावल्याचा आरोप केला आहे. हा आरोप खोडून काढून काढण्यासाठी खुद्द विनय शाक्य आज माध्यमांसमोर आले. त्यांनी अपहरणाच्या आरोपावर काही बोलण्यापेक्षा हसणे पसंत केले. स्वामीप्रसाद मौर्य यांच्यासोबत मी असून, लवकरच त्यांच्यासोबत समाजवादी पक्षात प्रवेश करेन, असा खुलासा त्यांनी केला आहे. औरेया जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनीही अपहरण झाले नसल्याचे म्हटले आहे.

विनय शाक्य यांच्या मुलीने म्हटले होते की, माझे वडील अनेक दिवसांपासून अंथरूणाला खिळून आहेत. ते चालूही शकत नाहीत. देवेश शाक्य यांनी याचा फायदा घेऊन स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी हे सगळे केले आहे. आज त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. ते जबरदस्तीने माझ्या वडिलांना घरातून घेऊन गेले. त्यांना लखनौला नेऊन समाजवादी पक्षात प्रवेश करायला लावला. आम्ही आजही भाजपचे काम करीत आहोत आणि कायम भाजपसोबत राहू. माझे वडील आजारी होते तेव्हा मदतीसाठी योगी आदित्यनाथच पुढे आले होते.

विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) तोंडावर उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) भाजपला जोरदार धक्का बसला आहे. भाजपच्या (BJP) उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यासह बडे नेते काल (ता. 11) दिल्लीत दाखल झाले. त्यानंतर काही तासांतच मंत्र्यांसह पाच आमदारांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मौर्य यांनी भाजपला रामराम करून समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे.

मौर्य यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचे समर्थक मानले जाणारे आमदार रोशन लाल वर्मा, ब्रिजेश प्रजापती, भगवती सागर आणि विनय शाक्य या आमदारांनीही पक्षाचा राजीनामा दिला आहे. हे चौघेही मौर्य यांच्याप्रमाणेच समाजवादी पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. मौर्य हे ओबीसी नेते असल्याने उत्तर प्रदेशात भाजपला मोठा फटका बसू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. इतर चारही नेतेही भाजपची डोकेदुखी वाढविण्याचे संकेत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT