Arvind Kejriwal, JP Nadda
Arvind Kejriwal, JP Nadda sarkarnama
देश

केजरीवाल सरकारने चक्क स्वच्छतागृहांनाही 'वर्ग' म्हणून दाखवले; भाजपचा गंभीर आरोप

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) अबकारी घोटाळा आणि शाळा खोल्या घोटाळ्यात नागरिकांची दिशाभूल करीत आहेत, असा आरोप भाजपने (BJP) केला आहे. तपास प्रक्रियेबद्दल काही आक्षेप असतील तर केजरीवाल न्यायालयात का जात नाही, असे भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा (JP Nadda) यांनी विचारले आहे. दिल्लीतील शाळांच्या वर्गखोल्या बांधकामात चक्क मुलांच्या स्वच्छतागृहांनाही 'वर्ग' म्हणून दाखविण्यात आले आहे, असा आरोप भाजपने केला आहे.

नड्डा म्हणाले, की आम आदमी पक्षाच्या सरकारने दिल्लीत दारू घोटाळा केला. मात्र, केजरीवाल आपल्या सरकारच्या शेकडो हजारो कोटींच्या घोटाळ्यावर बोलत नाही. त्यांच्यावर आरोप झाले की ते बाकीच्या गोष्टी बोलू लागतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी-गृहमंत्री अमित शहा यांच्यावर काहीही आरोप करत असतात. कधी म्हणतात की आम्हाला आत टाकतील. इकडचे तिकडचे न बोलता केजरीवाल यांनी दारु व शिक्षणासारख्या क्षेत्रात घोटाळे कसे झाले यावर बोलावे. मात्र, ते गैरव्यवहार प्रत्यक्ष झालेले असल्याने त्यांच्याकडे त्याबाबत उत्तरे नाहीत म्हणून ते काहीही बोलत आहेत, असा हल्लाबोल नड्डा यांनी केला आहे.

दारु घोटाळ्यातील आरोपांबद्दल उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची चौकशी सुरू झाली. त्याविरूध्द केजरीवाल यांनी न्यायालयात गेले पाहिजे. पण तसे ते करणार नाहीत, असेही नड्डा म्हणाले. दरम्यान, दिल्लीतील सत्तारूढ 'आप' हा पक्षच पाप आहे असा टोलाही भाजपने लगावला आहे. भाजप प्रवक्ते गौरव भाटिया म्हणाले की दिल्लीत शाळांच्या वर्गखोल्यांच्या घोटाळ्यात केजरीवाल सरकारने त्यांच्याजवळच्या ठेकेदारांना बेकायदेशीरपणे आर्थिक लाभ करून दिला आहे.

५० ते ९० टक्के वाढीव बांधकाम खर्च दाखवून सार्वजनिक बांधकाम कायदा व नियमावलीतील तरतुदींकडे दुर्लक्ष करून दाखवले. एका अंदाजानुसार हा खर्च ३२६ कोटी रूपयांनी वाढला तो निविदेच्या मूळ किंमतीपेक्षा प्रचंड जास्त होता. शाळांतील स्वच्छतागृहांनाही मुलांचे वर्ग असल्याचे दाखवून केजरीवाल सरकारने घोटाळा केल्याचे ते म्हणाले. भाटिया म्हणाले की केजरीवाल यांनी दिल्लीत ५०० नव्या शाळा बनवल्याचा दावा केला होता. मात्र, तिथे शाळाच नाहीत. जर ६ हजार १३३ वर्गखोल्यांची गरज होती तर ४०२७ खोल्याच बांधण्यात आल्या. मग खर्च पूर्ण योजनेचा कसा दाखविला गेला, असे सवाल त्यांनी केले आहे.

केजरीवाल सरकारच्या डीएनएमध्येच भ्रष्टाचार असल्याचे भाटीया म्हणाले. गेले तीन महिने तुरूंगात असलेले सत्येंद्र जैन यांना मंत्रीपदावरून हटविलेले नाही. त्यांना केजरीवाल यांनी सर्वांत प्रामाणिक असे प्रमाणपत्र दिले पाहिजे असाही टोला त्यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT