Manik Saha, Vinod Tawde and Bhupender Yadav
Manik Saha, Vinod Tawde and Bhupender Yadav  Sarkarnama
देश

भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना लॉटरी! आधी राज्यसभा अन् महिनाभरातच मुख्यमंत्र्यांची खुर्ची

सरकारनामा ब्युरो

आगरतळा : त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लवकुमार देव (Biplab Kumar Deb) यांना डच्चू देण्यात आला आहे. भाजपने (BJP) मुदत संपण्याआधीच देव यांना पदावरून हटवलं. यानंतर काही तासांतच भाजपनं डॉ.माणिक साहा (Manik Saha) यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकली आहे. साहा हे डेन्टिस्ट असून, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. विशेष म्हणजे, मागील महिन्यातच भाजपकडून साहा यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं होतं. आता त्यांना थेट मुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागली आहे.

खासदार डाॅ. साहा यांची मुख्यमंत्रिपदी नियुक्ती करुन भाजपने धक्कातंत्र वापरलं आहे. डाॅ. साहा मागील निवडणुकीनंतर भाजपशी जोडले गेले होते. ते मागील महिन्यात 3 तारखेला राज्यसभा खासदार बनले. यानंतर महिनाभरातच भाजप नेतृत्वाने त्यांची त्रिपुरात मुख्यमंत्री म्हणून निवड करण्याची खेळी खेळली आहे. कर्नाटक, उत्तराखंड, गुजरातप्रमाणे भाजपने त्रिपुरात रणनीती आखली आहे. याचबरोबर आधीचे सगळे मंत्रिमंडळही बदलले जाणार असल्याचे समजते.

त्रिपुरात सत्तेत आल्यानंतर देव यांच्या खांद्यावर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. आज त्यांनी तडकाफडकी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. नवीन मुख्यमंत्री निवडण्यासाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून विनोद तावडे (Vinod Tawde) आणि भूपेंद्रकुमार यादव राज्यात दाखल झाले होते. यानंतर पक्षाच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीत नवीन मुख्यमंत्र्यांची निवड करण्यात आली. मुख्यमंत्री म्हणून डॉ. माणिक साहा यांच्या नावावर या बैठकीत शिक्कामोर्तब झालं. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर पक्षाने हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.

त्रिपुरात पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक (Assembly Election) होत आहे. निवडणुकीला सुमारे वर्षभराचा कालावधी असतानाच मुख्यमंत्रिपदावरून देव यांना हटवण्यात आलं. राज्यातील भाजपमध्ये गटबाजी उफाळून आल्यानं पक्ष नेतृत्वानं हे पाऊल उचललं आहे. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी देव यांना दिल्लीला पाचारण करण्यात आलं होतं. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्याशी त्यांनी चर्चा केली होती. त्याचवेळी देव यांच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब झालं होतं.

राज्यपाल एस.एन.आर्य यांच्याकडे देव यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला. राजीनामा दिल्यानंतर बोलताना त्यांनी पक्षाने संघटनेची ताकद वाढवण्याची जबाबदारी दिल्याचं सांगितलं. दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्रिपुराचे (Tripura) माजी आरोग्य मंत्री सुदीप रॉय बर्मन आणि आशिष कुमार साहा यांनी आमदारकीचा राजीनामा देत भाजपलाही रामराम ठोकला होता. त्यानंतर दोघांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यामुळं भाजपला लागलेली गळतीही नेतृत्वासाठी डोकेदुखी ठरली होती. अखेर गटबाजी आणि गळती रोखण्यासाठी मुख्यमंत्री बदलाचा निर्णय घेण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT