Bjp, congress
Bjp, congress sarkarnama
देश

भाजपला भारत जोडोची धास्ती; 'आयटीसेल' विलक्षण सक्रिय

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात 'भारत जोडो' यात्रा सुरु झाली आहे. या यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसला नवी उर्जा देण्याचा राहुल गांधी यांचा प्रयत्न आहे. मात्र, या यात्रेवर भाजपने सुरुवातीपासूनच जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या पासून भाजपच्या (BJP) 'आय टी सेल' सेलने शाब्दीक हल्ले सुरू केले आहेत.

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू झाल्यानंतर भाजपचा दिल्लीच्या अशोका रस्त्यावरून कार्यरत होणारा 'आय टी सेल' विलक्षण सक्रिय झाला आहे. राहुल गांधी यांचा कथित विदेशी टी शर्ट, ते मुक्काम करणार असलेला कंटेनर व त्यातील सुविधा, वादग्रस्त धर्मप्रसारक जॉर्ज पोन्नय्या यांची राहुल यांनी घेतलेली भेट आदी गोष्टी हुडकून-हुडकून भाजप रोज या यात्रेवर टीका करत आहेत.

यात्रेवरुन भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार ट्वीटर वार रंगले आहे. भाजपच्या आयटी सेलला जोरदार टक्कर देण्यासाठी काँग्रेसनेही तयारी केली आहे. राहुल गांधी यांच्यावर टी-शर्टवरुन टीका होताच काँग्रेसनेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १० लाखाच्या कोटाचे फोटो समोर करत टीका केली. त्यामुळे भारत जोडोच्या माध्यमातून भाजप आणि काँग्रेस पुन्हा आमने-सामने आले आहेत.

अमित शहा यांनीही राहुल गांधी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, 'राहुल बाबा परदेशी टी-शर्ट घालून भारत जोडण्यासाठी निघाले आहेत. राहुल बाबा नुकतेच भारत जोडो यात्रेसाठी निघाले आहे. राहुल बाबा आणि काँग्रेसजनांना त्यांच्या संसदेतील भाषणाची मी आठवण करून देतो. राहुल बाबा तेव्हा म्हणाले होते की भारत हे राष्ट्र नाही. अहो राहुल बाबा, कुठली पुस्तके वाचलीत? मॉं भारती हे ते राष्ट्र आहे ज्यासाठी लाखो लोकांनी बलिदान दिले आहे, असा हल्लाबोल शहा यांनी केला आहे.

देशाची एकता व अखंडता अबाधित रहावी यासाठी राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर 'भारत जोडो' यात्रा सुरु केली असून या यात्रेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेला मिळत असलेला प्रतिसाद पाहून भारतीय जनता पक्ष बिथरला आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.

तसेच राहुल गांधी यांच्या टीशर्टच्या किंमतीसारखे टुकार मुद्दे भाजपला काढावे लागत आहेत. यातूनच 'भारत जोडो यात्रे'मुळे भाजपला धडकी भरली आहे. हे सिद्ध होत आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला. काँग्रेस संपली, राहुल गांधी यांना भाजप महत्व देत नाही असे म्हणणारे भाजपचे डझनभर नेते, प्रवक्ते, मंत्री राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यासाठी व त्यांची बदनामी करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. राहुलजी गांधी यांनी 'भारत जोडो' यात्रा सुरु करताच भाजपच्या नेत्यांची कोल्हेकुई सुरु झाली. कारण या यात्रेला जनतेचाच प्रतिसाद मिळत आहे. जनतेचे प्रश्न घेऊन त्यांच्याशी संवाद साधत राहुल गांधी देश पिंजून काढत आहेत, असेही पटोले म्हणाले.

राहुल गांधी यांच्या टी शर्टची किंमत दाखवणाऱ्या पक्षाचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी तर १० लाखांचा सुट, १. ५ लाखांचा चष्मा, ८० हजाराची शाल, १२ लाखांची कार, ८ हजार कोटी रुपयांचे विमान वापरातात आणि वरून मी फकिर आहे असा कांगवा करतात. असा फकिर आपल्या देशाला लाभला आहे याचे भान भाजपने तरी ठेवायला हवे. राहुल गांधी यांच्या टी शर्टची चिंता करण्यापेक्षा देशाच्या १३० कोटी जनतेला उघड्यावर आणणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारची घटका भरत आली आहे, त्याची चिंता भाजपने करावी, अशा निशाणा पटोले यांनी भाजपवर साधला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT