Maharashtra sadan
Maharashtra sadan sarkarnama
देश

गोठविणाऱ्या थंडीत गार पाण्यानं अंघोळीचं ‘सुख' अनुभवण्यासाठी महाराष्ट्र सदनात या !

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : संसद अधिवेशन तोंडावर आले असून या काळात राज्यातील खासदार, मंत्री यांचे नातेवाईक, पाहुणे आदींचीही वर्दळ सदनात असते. अशा काळात नेमकी सौरउर्जा यंत्रणा बिघडल्याने सदनाच्या प्रशासनासमोर आव्हान उभे राहिले आहे. दिल्लीतील गोठविणाऱ्या थंडीत सकाळी सकाळी थंडगार पाण्याने अंघोळ करण्याचे ‘सुख' अनुभवायचे असेल तर राजधानीतील पंचतारांकित नवीन महाराष्ट्र सदनात (Maharashtra sadan)भेट द्या!

दिल्लीतील (Delhi)गोठविणाऱ्या थंडीत सकाळी सकाळी थंडगार पाण्याने अंघोळ करण्याचे ‘सुख' अनुभवायचे असेल तर राजधानीतील पंचतारांकित नवीन महाराष्ट्र सदनात भेट द्या.. येथील सौरउर्जेवर चालणारी पाणी गरम करण्याची यंत्रणाच बिघडल्याने येणाऱ्या पाहुण्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. ही समस्या उद्भवली असल्याचे सदनाच्या प्रशासनाने मान्य केले आहेत. नजिकच्या काळात संबंधित तांत्रिक दुरूस्ती करण्यात येईल असे म्हटले आहे.

दिवाळीनंतर दिल्लीत थंडीचा कडाका वाढला आहे. आगामी आठवडाभरात थंडीचे प्रमाण अधिक वाढेल. यंदा ला निना मुळे दिल्लीसह उत्तर भारतात हाडे गोठविणारी थंडी पडेल व डिसेंबर-जानेवारीच नव्हे तर आगामी फेब्रुवारी महिनाही दिल्लीकरांना हुडहुडी भरविणारा ठरेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राजधानीत थंडीचा कडाक वाढलेला असतानाच नवीन महाराष्ट्र सदनातील पाणी गरम करण्याच्या यंत्रणेने मात्र दगा दिला आहे. ही माहिती 'सरकारनामा'ला नुकतीच समजली तरी हा प्रश्न गेला सुमारे दीड महिना कायम असल्याची माहिती आहे.

दिल्लीतील आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदशर्नात महाराष्ट्राच्या दालनास भेट देणाऱ्या पाहुण्यांना राज्याचे विद्युत धोरण अत्यंत पसंत पडत असल्याचे राज्याच्या प्रसिध्दी विभागाने म्हटले आहे. खुद्द दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील सौर उर्जा यंत्रणा कुचकामी ठरली याची माहिती यातील किती जणांना मिळते हे स्पष्ट झालेले नाही.

महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त शामलाल गोयल यांनी, पाणी गरम करण्याच्या यंत्रणेत बिघाड झाल्याचे मान्य केले. ही समस्या सौरउर्जा संयंत्रे सदनाच्या मुख्य वाहिनीशी जोडणाऱ्या यंत्रणेतील बिघाडामुळे झाली आहे. ही तात्पुरती समस्या असून ती लवकरच दुरूस्त होईल असे गोयल यांनी सांगितले. मात्र लवकरच म्हणजे कधी हे त्यानी स्पष्ट केले नाही. साधारणतः दिल्लीतील थंडीचा कडाका लक्षात घेता आँक्टोबरच्या आसपास हिटर यंत्रणा सुरू करणे ही जबाबदारी सदनातील अभियंत्यांची अंतिम जबाबदारी सदनाच्या व्यवस्थापकांची आहे. सदनाच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा भ्रमणध्वनी सातत्याने बंद आहे. त्या रजेवर असल्याची माहिती सदनातून मिळाली.

नगरपालिका, महानगरपालिकांचे पदाधिकारी व अधिकारी दिल्लीत नुकतेच आले होते. त्यांनाही दिल्लीच्या वाढत्या थंडीत तंडगार पाण्याने अंघोळ करण्याचा अनुभव घ्यावा लागला. ज्यांनी प्रशासनाकडे तक्रार केली त्यांना त्या त्या दिवशी व्यवस्था उपलब्ध करून दिली गेली. विज्ञान भवनात नुकतीच एक वैद्यकीय तज्ज्ञांची परिषद झाली. तीत आलेल्या एका तज्ज्ञाने गरम पाणी मिळत नसल्याची व नळाला गढूळ पाणी येत असल्याची तक्रार सदनाच्या प्रशासनाकडे केली. मात्र काहीही उपाययोजना न झाल्याने या सरळमार्गी तज्ज्ञांनी दिल्लीतील आपल्या एका नातेवाईकांना याबद्दल सांगितले. त्यांनी त्यांच्यासाठी तातडीने पाणी गरम करण्याचा विजवर चालमारा रॉडही खरेदी केला. दरम्यानच्या काळात सदनातून संबंधितांना गरम पाणी बादलीतून मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली. मात्र अन्य खोल्यांमधील गार पाण्याची परिस्थिती कायम आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT