Eknath Shinde | Delhi
Eknath Shinde | Delhi  Sarkarnama
देश

उद्धव ठाकरेंना नेता मानता का?; या प्रश्नावर एकनाथ शिंदेंनी वाजवली पुन्हा तीच टेप

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या हिताची भूमिका घेतलेल्या शिवसेनेच्या (Shivsena) १२ खासदारांची भेट घेण्यासाठी आणि उद्या सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणासंबंधित सुनावणी आहे. अशा दोन्ही गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आपण दिल्लीला आलो होतो. आज १२ खासदारांनी महाराष्ट्राच्या विकासाची भूमिका घेत आपल्याला पाठिंबा दिला आहे. त्यानुसार आज शिवसेना लोकसभा गट तयार करुन १२ खासदारांचे एक पत्र लोकसभा अध्यक्षांकडे दिले आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माध्यमांसमोर बोलताना दिली.

१२ खासदारांची बैठक संपल्यानंतर महाराष्ट्र सदनामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे आणि १२ खासदार बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच खासदार राहुल शेवाळे यांची शिवसेनेचे गटनेता म्हणून आणि खासदार भावना गवळी यांचा मुख्य प्रतोद म्हणून उल्लेख केला. हे १२ खासदार २० ते २२ लाख लोकांचे प्रतिनिधित्व करतात. या सर्व खासदारांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे, त्यांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. या सर्वांनी आज लोकसभेच्या अध्यक्षांना पत्र देखील दिले आहे, असे शिंदे म्हणाले.

खासदार राहुल शेवाळे, भावना गवळी, श्रीरंग बारणे, धैर्यशील माने यांच्या नावाचा उल्लेख करत महाराष्ट्रातील ५० आमदारांनी भाजपसोबत जाण्याची जी भूमिका घेतली तीच भूमिका या १२ खासदारांनी घेतली आहे, असे शिंदे यांनी यावेळी सांगितले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत. त्याला खासदारांनी साथ दिली आहे. शिवसेना आणि भाजप यांची निवडणूक पूर्व युती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या सरकारला पूर्ण सहकार्य देऊ केले आहे. केंद्र आणि राज्य सरकार एकत्र आले तर विकास चांगला होऊ शकतो, असे या खासदारांना वाटत आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या आरोपांचीही खिल्ली उडवली. संजय राऊत यांनी या १२ खासदारांनी दबावापोटी आणि ईडीच्या भीतीमुळे शिंदे गटाला पाठिंबा दिला असल्याचा आरोप केला. यावर बोलताना शिंदे म्हणाले, आणखी कोणी यावर बोलले असते तर त्याची दखल घेतली असती. पण संजय राऊत यांच्या आरोपांना उत्तर देण्याची गरज नाही. जे रोज सकाळी येवून टीव्हीवर बोलत होते, तो मॅटिनी शो आता बंद झाला आहे. पण तुम्हाला रोज बातम्या हव्या असतात, त्यामुळे तुम्ही (पत्रकार) राऊत यांच्या विधानांना महत्व देता, असेही शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदे यांना यावेळी उद्धव ठाकरे यांना आपला नेता मानता का या प्रश्नावर बोलताना पुन्हा आपले तेच उत्तर दिले. ते म्हणाले, आम्ही बाळासाहेंबांची भूमिका घेवून राज्यात सरकार बनवले आहे. विधानसभेत आपल्याला विधिमंडळ पक्ष म्हणून मान्यता मिळालेली आहे. आता लोकसभेत देखील आपल्याला शिवसेना संसदीय पक्ष म्हणून मान्यता मिळालेली आहे. संघटना म्हणून देखील आपण शिवसेनेतच आहोत.

सरकारही शिवसेनेचेच आहे. आम्ही पूर्वी देखील एनडीएचे घटक होतो, आजही आहेत. एकनाथ शिंदे पक्षप्रमुख झालेले नाही. केवळ महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो आहे. एकनाथ शिंदे हा त्या सभागृहाचा नेता आहे. तसेच कार्यकारिणीवर विश्वास नाही यावर बोलताना शिंदे म्हणाले, कोणतेही नियमबाह्य काम आपण केलेले नाही. शेवटी देशात कायदा असतो, नियम असतात, घटना असते. न्यायव्यवस्थेवर आपला विश्वास आहे. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, १२ खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे ३ प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. यात १) आम्हीच अधिकृत शिवसेना असून आमच्याकडे संसदीय बहुमत आहे. २) त्यामुळे लोकसभेत वेगळा गट म्हणून आम्हाला मान्यता मिळावी. ३) भावना गवळी याच शिवसेनेच्या लोकसभेतील मुख्य प्रतोद (चीफ व्हीप) असतील. पत्र दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना खासदारांनी, बहुमताचा कल पाहून लोकसभा अध्यक्ष याच गटाला मान्यता देतील व त्यांची आसन व्यवस्था (डिव्हीजन क्रमांक) या आठवड्यातच बदलेलं असा विश्वास व्यक्त केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT