Congress Leader Rahul Gandhi and CM M K Stalin
Congress Leader Rahul Gandhi and CM M K Stalin Sarkarnama
देश

पेरारिवलनच्या सुटकेवरून काँग्रेस अन् डीएमकेमध्ये मतभेदाची ठिणगी

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांचा मारेकरी ए. जी. पेरारिवलन याची सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर काँग्रेस व मित्रपक्ष असलेल्या डीएमकेमध्ये मतभेदाची ठिणगी पडली आहे. या निर्णयाचे काँग्रेसनं दु:ख व्यक्त केलं आहे. तर डीएमकेनं स्वागत करत राहुल गांधींकडे बोट दाखवलं आहे. (Supreme Court orders release of AG Perarivalan)

पेरारिवलनच्या सुटकेच्या आदेशानंतर काँग्रेसचे (Congress) प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आम्हाला दु:ख झाले आहे. हा निर्णय दुर्दैवी आहे. कारण न्यायालयाने राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना सोडलं आहे.

तमिळनाडूचे तत्कालीन राज्यपाल बनवारीलाल पुरोहित आणि राष्ट्रपतींनी निर्णय न घेतल्याने न्यायालयाने हा निकाल दिला. आज देशासाठी दु:खद दिन आहे. राजीव गांधी हे काँग्रेसचे नेते नव्हे देशाचे पंतप्रधान होते, अशी नाराजी सुरजेवाला यांनी व्यक्त केली.

स्टॅलिन यांच्याकडून स्वागत

काँग्रेसने नाराजी व्यक्त केली असली तरी तमिळनाडूत त्यांचा मित्र असलेल्या डीएमकेने स्वागत केलं आहे. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी निकालानंतर पेरारिवलनच्या आईशी दुरध्वनीवरून संवाद साधला. आता त्यांचे कुटुंब मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे.

डीएमकेचे प्रवक्ते ए. सरवनन यांनी हा निर्णय ऐतिहासिक असल्याचे म्हटलं आहे. राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळे हे झाले आहे. राहुल गांधी यांनी आपल्या वडिलांच्या मारेकऱ्यांना माफ करत आहे, असं म्हटलं होतं. त्यामुळे त्यांचंही कौतुक व्हायला हवे, असं सरवनन यांनी सांगितले.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने कलम 142 नुसार प्राप्त विशेषाधिकाराचा वापर करत सुटकेचा आदेश दिला आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर आपल्या गावी असलेल्या पेरारिवलन व त्याच्या नातेवाईकांनी आनंद व्यक्त करत मिठाई वाटली. या प्रकरणातून मुक्त झाल्यानंतर आता काही काळ मोकळा श्वास घेऊ द्या, असं पेरारिवन म्हणाला आहे.

मृत्यूदंडाच्या शिक्षेची गरज नाही, अशी भावनाही त्याने व्यक्त केली आहे. मी आताच बाहेर आलो आहे. मागील 31 वर्ष न्यायालयीन लढा सुरू होता. मला आता थोडा मोकळा श्वास घ्यायचा आहे. मला काही वेळ द्या, असं तो आपल्या भविष्याबाबत विचारल्यानंतर म्हणाला.

मृत्यूदंडाच्या शिक्षेचा गरज नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. केवळ दयेसाठी नाही. तर सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांसह अनेक न्यायाधीशांना असंच वाटतं. अशी अनेक उदाहरणे आहेत. प्रत्येक जण माणूस आहे, अशी अपेक्षाही पेरारिवलन याने व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT