Congress protest Against Inflation
Congress protest Against Inflation Sarkarnama
देश

काँग्रेसच्या दोन नेत्यांची आमदारकी धोक्यात; विधानसभा अध्यक्ष लवकरच घेणार निर्णय

सरकारनामा ब्युरो

गुवाहाटी : काँग्रेसच्या दोन नेत्यांची आमदारकी आता धोक्यात आली आहे. त्यांना अपात्र ठरवावे, अशी मागणी काँग्रेसनेच विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे. विधानसभा अध्यक्ष या आमदारांना कारणे दाखवा नोटीस बजावणार आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत या दोन आमदारांनी पक्षाचा आदेश मानला नव्हता. यामुळे पक्षादेश धुडकावणे या आमदारांना चांगलेच महागात पडण्याची चिन्हे आहेत.

आमदार सिद्दीकी अहमद आणि शशिकांत दास यांच्यावर कारवाईसाठी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. अहमद हे करीमगंज दक्षिणचे तर दास हे राहा मतदारसंघाचे आमदार आहेत. राज्यसभा निवडणुकीत अहमद यांनी मतदानावेळी जाणीवपूर्वक चूक केली तर दास यांनी भाजपला मतदान केले होते. यामुळे काँग्रेसला राज्यसभेच्या एका जागेवर पाणी सोडावे लागले होते आणि भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (NDA) उमेदवार विजयी झाला होता.

याबाबत बोलताना विधानसभा अध्यक्ष विश्वजित डेमरी म्हणाले की, हा कायदेशीर मुद्दा आहे. विरोधी पक्षनेत्यांनी या दोन आमदारांना अपात्र ठरवावे, असा अर्ज केला आहे. या दोन आमदारांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली जाईल. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन काही दिवसांत अंतिम निर्णय घ्यावा लागेल.

आसाममध्ये (Assam) राज्यसभेच्या (Rajys Sabha) दोन जागांसाठी नुकतीच निवडणूक झाली. यातील एक जागा बिनविरोध झाली तर एका जागेसाठी मतदान झाले. या निवडणुकीत काँग्रेसचे (Congress) आमदार सिद्दीकी अहमद यांनी मतदान करताना तांत्रिक चूक केली. त्यामुळे त्यांचे मत रद्द झाले तर काँग्रेसचे दुसरे आमदार दास यांनी भाजपला मतदान केले. यामुळे भाजप आघाडीचे राँग्वरा नार्झरे विजयी झाले होते तर काँग्रेसचे रिपुन बोरा पराभूत झाले होते. हे दोन आमदार मतपत्रिकेवर अहमद यांना 1 हा आकडा लिहायचा होता. त्याऐवजी अहमद यांनी ‘one’ असे लिहिले. त्यामुळे त्यांचे मत बाद झाले होते. या दोन्ही आमदारांना काँग्रेसने निलंबित केले आहे.

राज्यसभा निवडणुकीत आसाममधून भाजपचे (BJP) पवित्र मार्गरिटा हे बिनविरोध निवडून आले होते. दुसऱ्या जागेसाठी भाजप आघाडीकडून युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल पक्षाचे राँग्वरा नार्झरे हे मैदानात उतरले होते. त्यांच्या विरोधात काँग्रेसने बोरा यांना उतरवले होते. आसाम विधानसभेतील एकूण 126 मतांपैकी 83 मते भाजप आणि सहकारी पक्षांकडे होती. ही मते मार्गरिटा यांना निवडून आणण्यास पुरेशी होती. दुसऱ्या उमेदवाराला निवडून येण्यासाठी 43 मते आवश्यक होती. काँग्रेससह विरोधी पक्षांकडे 44 मते होती. परंतु, अहमद यांनी त्यांचे मत वाया घालवले. यामुळे अखेर बोरा यांचा पराभव झाला आणि भाजपने दुसरी जागाही जिंकली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT