पाटणा : राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नावांवरुन बिहारमधील राजकारण तापले आहे. या सदस्यांची लवकरच नियुक्ती केली जाईल, असे विधान मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केले आहे. यावर काँग्रसने आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसने राज्यपालांकडे धाव घेत त्यांनी यात हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे.
मुख्यमंत्री नितीशकुमार हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर राज्यात परतले आहेत. त्यांनी विधान परिषदेवर राज्यपालनियुक्त १२ सदस्यांची लवकरच निवड केली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली आहे. यावर काँग्रेसने राज्यपालांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. प्रत्येक पक्षाच्या कोट्यानुसार राजपालनियुक्त सदस्यांची निवड व्हावी, असे काँग्रेसने म्हटले आहे.
काँग्रेसचे आमदार प्रेमचंद्र मिश्रा यांनी म्हटले आहे की, राज्यपालनियुक्त सदस्यांमध्ये राजकीय व्यक्तींचा समावेश करु नये. कृषी, विज्ञान आणि कला क्षेत्रातील .तज्ज्ञ व्यक्तींची निवड यात करावी. कर्नाटकमध्येही याबाबत न्यायालयाने नुकताच आदेश देण्याच आला आहे. राज्यपालनियुक्त सदस्यांना मंत्री करु नये, असा हा आदेश आहे.
यावर संयुक्त जनता दलाने (जेडीयू) काँग्रेसला उत्तर दिले आहे. काँग्रेसला या प्रकरणात केवळ राजकारण करायचे आहे, असा आरोप जेडीयूने केला आहे. काँग्रेसच्या कार्यकाळातच राज्यपालनियुक्त सदस्यांच्या निवडीच्या नियमांचा मोठ्या भंग करण्यात आल्याचेही जेडीयूने म्हटले आहे.
दरम्यान, बिहारमधील भाजप आणि संयुक्त जनता दलाच्या (जेडीयू) सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर झाला आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात नव्याने 17 मंत्र्यांचा समावेश झाला आहे. यामुळे राज्यातील मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या आता 30 वर गेली असली तरी अद्याप सहा जागा रिकाम्या आहेत.
राज्यपाल फागू चौहान यांनी 17 नवीन मंत्र्यांना शपथ दिली होती. यात भाजपचे 9 आणि जेडीयूचे 8 मंत्री आहेत. यात भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहनवाज हुसेन, प्रमोद कुमार, आलोक रंजन झा, नितीन नवीन, नारायण प्रसाद, नीरजसिंह बबलू, सुभाषसिंह, सम्राट चौधरी यांचा समावेश आहे. जेडीयूच्या मंत्र्यांमध्ये श्रवणकुमार, संजय झा, लेसी सिंह, सुनीलकुमार, जयंत राज, मदन साहनी, सुमितसिंह, जमा खान यांचा समावेश आहे.
नव्या मंत्र्यांमध्ये प्रथमच मंत्रिमंडळात समावेश झालेले भाजपचे मंत्री अधिक आहेत. भाजपने अधिक नव्या चेहऱ्यांना संधी दिली असून, जेडीयूने मात्र, मागील वेळी मंत्रिमंडळात असलेल्यांना प्राधान्य दिले आहे. नितीश सरकारचा शपथविधी मागील 16 नोव्हेंबरला झाला होता त्यावेळी मुख्यमंत्र्यासमवेत 14 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. मात्र, नंतर मेवालाल चौधरी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
अनेक दिवसांपासून राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे. मात्र, याला भाजपकडून विलंब लावला जात आहे. विस्तारासाठी भाजपकडून नावे दिली जात नसल्याचे खुद्द नितीशकुमारांनी उघड केले होते. यामुळे दोन्ही पक्षांतील मतभेद दूर झाले नसल्याचे समोर आले होते. नितीशकुमार यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात कधीही मंत्रिमंडळ विस्ताराला एवढा कालावधी लागलेला नव्हता. नितीशकुमारांनीच याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी म्हटले होते की, याआधी कधीही मला मंत्रिमंडळ विस्तारास एवढा वेळ लागला नव्हता. आम्ही सुरवातीलाच मंत्रिमंडळ विस्तार करीत होतो.
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.