BJP and Congress
BJP and Congress  Sarkarnama
देश

मुख्यमंत्र्यांनी मंत्र्याचा राजीनामा घेण्याची तयारी दाखवताच काँग्रेसनं टाकला डाव!

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : कंत्राटदार संतोष पाटील (Santosh Patil) आत्महत्या प्रकरणी भाजपच्या (BJP) कर्नाटकातील (Karnataka) सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणी ग्रामविकास मंत्री के. एस. ईश्वरप्पा (K. S. Eshwarappa) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. विरोधकांकडून दबाव वाढू लागल्याने अखेर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांनी ईश्वरप्पांचा राजीनामा घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावरुन काँग्रेसने मुख्यमंत्र्यांनाच अडचणीत आणण्याचा डाव टाकला आहे. (Santosh Patil Death Case News)

ग्रामविकास मंत्री के.एस.ईश्वरप्पा यांच्यावर कारवाईसाठी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली होती. आता ईश्वरप्पा यांच्यावर गुन्हा दाखल होऊन ते राजीनामा देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे काँग्रेसने आपला मोर्चा मुख्यमंत्री बोम्मई यांच्याकडे वळवला आहे. सरकारमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा काँग्रेसने उचलून धरला आहे. या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांची कोंडी करण्याचा डाव काँग्रेसनं टाकला आहे. काँग्रेसने भाजपच्या सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे.

काँग्रेसचं आंदोलन हे ग्रामविकास मंत्री के.एस. ईश्वरप्पा यांच्या राजीनाम्यासाठी नाही. ते भ्रष्टाचाराविरोधात आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते की ईश्वरप्पांनी काहीही चूक केलेली नाही. त्यांनी काही चूक केली नसेल तर तुम्ही राजीनामा का घेत आहात?, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार (D.K.Shivkumar) यांनी उपस्थित केला आहे. यामुळे ईश्वरप्पांच्या राजीनाम्यानंतरही मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत. राज्य सरकारमधील भ्रष्टाचाराकडे काँग्रेसने आता लक्ष वळवले आहे.

संतोष पाटील आत्महत्या प्रकरणी सरकारवर नामुष्की ओढवली आहे. भाजपचा कार्यकर्ता असलेल्या कंत्राटदाराने सरकारमधील एका मंत्र्यावर आरोप करून आत्महत्या केल्याने भ्रष्टाचाराचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला आहे. सुरवातीला या प्रकरणी सरकारने ईश्वराप्पा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासही नकार दिला होता. अखेर दबाव वाढल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मुख्यमंत्री बोम्मई यांनी ईश्वरप्पांचा राजीनामा घेणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली होती. नंतर काही तासांतच ईश्वराप्पांचा राजीनामा घेणार असल्याचे जाहीर करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

बेळगाव येथील संतोष पाटील यांच्या कुटुंबीयांना ईश्वरप्पा यांच्याविरोधात तक्रार केली आहे. त्यानुसार ईश्वरप्पा यांच्यासह आणखी दोघांवर संतोष यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पाटील हे कंत्राटदार होते. तसेच हिंदू युवा वाहिनीचे राष्ट्रीय सचिव आणि भाजपचे कार्यकर्तेही होते. उडपी येथील एका हॉटेलमध्ये 12 एप्रिलला त्यांचा मृतदेह आढळून आला होता. ही आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मागील काही दिवसांपासून ते बेपत्ता होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT