Ghulam Nabi Azad News
Ghulam Nabi Azad News Sarkarnama
देश

नाराज आझाद देणार धक्का? एका वक्तव्यानं राजकारण ढवळलं

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : मागील दोन वर्षांपासून काँग्रेसमधील (Congress) जी २३ (G 23) या नाराज गटातील नेत्यांनी सतत नेतृत्वावर आगपाखड केली आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील निवडणुकांनंतर तर हा गट अधिकच आक्रमक झाला आहे. त्यातच ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांच्या एका वक्तव्यानं देशाचं राजकारण ढवळून निघालं आहे. काँग्रेससह देशातील सर्वच पक्ष समाजात दरी निर्माण करत असल्याचं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं आहे. तसेच राजकारणाबाबत ते मोठा निर्णय़ घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. (Political News)

जम्मूतील एका कार्यक्रमात बोलताना आझाद यांनी हे वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, आपल्याला समाजात बदल घडवायला हवा. राजकीय पक्ष २४ तास समाजात दरी निर्माण करण्याचे काम करत आङेत. धर्म, जात आणि इतर गोष्टींच्या माध्यमातून लोकांमध्ये दुरावा निर्माण करत आहेत. हा माझा पक्ष असेल किंवा इतर कोणताही प्रादेशिक किंवा राष्ट्रीय. मी त्यातील कुणालाच माफ करणार नाही. समाजाने एकत्र राहून दुष्टांचा सामना करायला हवा, अस म्हणत आझाद यांनी राजकारण्यांना दुष्ट असं संबोधले. (Ghulam Nabi Azad News)

राजकीय पक्षांनी लोकांना भूभाग, राज्य, गाव आणि शहरं, हिंदू आणि मुस्लिम, शिया आणि सुन्नी, दलित आणि इतर, मागासवर्गीयांमध्येही विभागले. मानवी मुल्यांचा यातून ऱ्हास झाला. देशातील राजकारण घाणेरडं बनलं आहे. काहीवेळा तर आपण माणूस आहोत का, अशी शंका येते, असं म्हणत आझाद यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिल्याचे बोलले जात आहे. सामाजिक कामांमध्ये झोकून देण्याची त्यांनी तयारी केल्याची चर्चा समाजमाध्यमांमध्ये रंगली आहे.

दि काश्मीर फाईल्स या चित्रपटावरून सुरू असलेल्या चर्चेबाबत त्यांनी भाष्य केलं. काश्मीरमध्ये जे घडलं त्यालं पाकिस्तान आणि दहशतवादी जबाबदार आहेत. जम्मू आणि काश्मीरमधील हिंदू, काश्मीरी पंडित, मुस्लिम आणि डोग्रा या सर्वांनाच त्रास झाला आहे, असं आझाद म्हणाले. जे प्रामाणिकपणे धर्माचे आचरण करतात तेच खरे धर्मनिरपेक्ष आहेत. महात्मा गांधी हे सच्चे हिंदू आणि धर्मनिरपेक्षतेचे मोठे समर्थक होते, असंही आझाद यांनी नमूद केलं.

आझाद यांनी काँग्रेससह सर्व राजकीय पक्षांवर आसूड ओढल्याने त्यांच्या राजकीय प्रवासाबाबत आता तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. काँग्रेसमधील नाराज गटातील ते प्रमुख नेते असून मागील दोन वर्षांपासून पक्षामध्येही निर्णयप्रक्रियेत त्यांना फारसे स्थान दिले जात नाही. पाच राज्यांतील प्रचार मोहिमेतही ते दिसून आले नाहीत. त्यामुळे राजकीय संन्यास घेण्याच्या तयारीत ते असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यांनी सर्वच पक्षांवर टीका केल्याने इतर कोणत्याही पक्षात ते जाणार नाही, अशी चर्चाही रंगली आहे.

नाराज नेत्यांना गांधी कुटुंबावर निशाणा

'जी 23' (G 23) मधील नेत्यांनी गांधी कुटुंबावर निशाणा साधला आहे. पाच राज्यांतील पराभवानंतर हे नेते आक्रमक झाले असून मागील आठवड्यात त्यांची महत्वपूर्ण बैठकही झाली. या बैठकीत काँग्रेसमधील नेतृत्वात बदल करण्याबाबत ठाम भूमिका घेण्यात आली आहे. काँग्रेसला वाचवायचे असेल तर सामूहिक आणि सर्वसमावेशक नेतृत्वाची गरज असल्याचे या नेत्यांनी स्पष्ट केलं आहे.

जी 23 मधील नेत्यांची बुधवारी रात्री आझाद यांच्या दिल्लीतील घरी एकत्रित आले होते. त्यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्यासह कपिल सिब्बल (Kapil Sibal), आनंद शर्मा, भूपेंद्र सिंह हुडा, मनीष तिवारी, अखिलेश प्रताप सिंह, शशी थरूर, राज बब्बर, कुलदीप शर्मा, प्रणित कौर, एम. ए. खान, शंकर सिंह वाघेला, मणिशंकर अय्यर, पी. जे. कुरियन, राजेंद्र कौर भट्टल, संदीप दिक्षीत या नेत्यांचा समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT