BJP and Congress  Sarkarnama
देश

ऐनवेळी माघारीचा बॉम्ब टाकून राणेंनी काँग्रेसला पाडलं तोंडावर

सरकारनामा ब्युरो

पणजी : गोव्यात विधानसभा निवडणुकीची (Goa Assembly Election) रणधुमाळी सुरू आहे. यातच काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे (Pratap Singh Rane) हे पर्येमधून मैदानात उतरले होते. राणेंचा सामना भाजपमधील (BJP) त्यांच्याच सूनबाईंशी होणार होता. काही दिवसांपूर्वी मुलाच्या विरोधात लढण्याची घोषणा करणारे राणे आता सुनेच्या विरोधात लढणार असल्याने सगळ्यांचे या लढतीकडे लक्ष लागले होते. परंतु, राणेंनी आज माघार घेऊन सगळ्यांनाच धक्का दिला आहे.

प्रतापसिंह राणे यांनी मुलाच्या विरोधात लढण्याची घोषणा केली होती. यानंतर काँग्रेसने तातडीने पावले उचलत राणे यांना पर्ये मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली होती. भाजपने त्यांचे पुत्र व आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना वाळपोई तर सूनबाई दिव्या यांना पर्येतून उमेदवारी दिली. यामुळे आता प्रतापसिंह राणे हे मुलाऐवजी सुनेच्या विरोधात मैदानात उतरणार होते. आज त्यांनी निवडणुकीच्या मैदानातून माघार घेण्याची घोषणा केली. वयाचे कारण त्यांनी यासाठी पुढे केले आहे.

राणे यांनी नुकतीच पर्ये येथील भूमिका देवी मंदिरात गाऱ्हाणे घालून काँग्रेसच्या प्रचाराची सुरवात केली होती. त्यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. यामुळे राणे माघार घेणार असल्याच्या चर्चेलाही पूर्णविराम मिळाला होता. असे असताना राणेंनी आज माघारीचा बॉम्ब टाकून सगळ्यांनाच धक्का दिला आहे. कुटुंबाचा कुठलाही दबाव असल्याचा त्यांनी इन्कार केला आहे. राणेंना लढण्यास नकार दिल्याने काँग्रेसची पंचाईत झाली आहे. ऐनवेळी काँग्रेसला आता दुसरा उमेदवार शोधावा लागणार आहे.

प्रतापसिंह राणे हे 82 वर्षांचे असून, ते 11 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते गोव्याचे सहा वेळा मुख्यमंत्री होते. त्यांनी पुत्राच्या विरोधातच निवडणूक लढण्याची घोषणा करुन राज्यात राजकीय भूकंप घडवला होता. विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातले राजकीय वातावरण तापले असताना राणे-पिता पुत्रांच्या लढतीने त्यात भर पडली होती. नंतर राणे हे मुलाऐवजी सूनबाई डॉ.दिव्या राणे यांच्या विरोधात लढणार असल्याचे स्पष्ट झाले होते. पर्ये हा प्रतापसिंह राणेंचा बालेकिल्ला असून, कायम त्यांचा तेथे विजय होत आला आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. काँग्रेसनेही जोर लावला असला तरी प्रत्यक्षात मागील निवडणुकीएवढी ताकद आता राहिलेली दिसत नाही. मागील निवडणुकीत काँग्रेसला 40 पैकी 17 जागा मिळाल्या होत्या. सर्वाधिक आमदार काँग्रेसचे होते पण त्रिशंकू स्थितीमध्ये काँग्रेसला चकवा देत भाजपने सत्ता स्थापन केली होती. हीच काँग्रेसची धूळधाण उडण्याची सुरूवात होती. निवडणुकीच्या तोंडावर राज्यात काँग्रेसचे केवळ 2 आमदार उरले असताना काँग्रेसनेही आता भाजपच्या अनेक नेत्यांना फोडले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT