Rahul Gandhi  Sarkarnama
देश

Rahul Gandhi : लसणाचा भाव किती..? राहुल गांधींनी गाठली मंडई, महागाईवरून महिलांचा संताप

Delhi Market Rahul Gandhi Visit : दिल्लीतील एका भाजी मंडई जाऊन राहुल गांधींनी भाज्यांचे भाव विचारले. तसेच तेथील महिलांशीही संवाद साधला.

Rajanand More

New Delhi News : मागील काही महिन्यांपासून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सातत्याने दिल्लीतील विविध घटकांतील लोकांच्या गाठीभेटी घेताना दिसत आहेत. कधी ते रिक्षामध्ये दिसतील तर कधी रेल्वे कर्मचाऱ्यांशी बोलताना. नुकताच त्यांनी दिल्लीतील एका भाजी मंडईचाही फेरफटका मारला. याबाबतचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियात पोस्ट केला आहे.

दिल्लीतील विधानसभेची निवडणूक पुढील एक-दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यासाठी राहुल गांधींकडून विविध भागातील मतदारांच्या थेट गाठीभेटी घेण्यावर भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी नुकतीच दिल्लीतील गिरीनगर भागात हनुमान मंदिर भाजी मंडईला भेट दिली. याठिकाणी ते भाजी विक्रेत्यांना भाज्यांचे भाव विचारताना दिसत आहेत. तसेच भाजी खरेदी करण्यासाठी आलेल्या महिलांना त्यांनी महागाईबाबत विचारपूस केल्यानंतर त्यांनी आपला संतापही व्यक्त केला.

राहुल यांनी व्हिडीओ पोस्ट करताना म्हटले आहे की, ‘40 रुपयाचा लसूण 400 रुपये झाला आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्य नागरिकांचे बजेट बिघडवले असून सरकार मात्र कुंभकर्णाप्रमाणे झोपले आहे.’ दरम्यान, व्हिडीओमध्ये महिला राहुल यांना सांगताना दिसत आहेत की, पगार तर कुणाचा वाढला नाही. पण भाव वाढले आहेत आणि आता कमी होण्याचे नाव घेत नाहीत, पुढे आणखी वाढतील.

आज काय घेत आहात, असे राहुल महिलांना विचारताना दिसत आहेत. त्यावर एक महिला सांगते, ‘थोडे टोमॅटो, कांदे घेत आहे. जेणेकरून काहीतरी होईल.’ एक महिला भाजीवाल्याला विचारते, ‘यावेळी भाजी एवढी महाग का आहे? काहीच भाव कमी होत नाही. कोणतीच भाजी 30-35 रुपयाची नाही. सगळ्या 40-45 पेक्षा जास्त आहेत.’

भाजी विक्रेत्यानेही महागाई वाढल्याचे मान्य केले. यावेळी महागाई खूप आहे. यापूर्वी एवढी महागाई कधी नव्हती, असे भाजी विक्रेता बोलताना दिसत आहे. त्यानंतर मग राहुल गांधी लसूण कितीचा आहे, असे विचारात. त्यावर भाजी विक्रेत्याकडून 400 रुपये किलो भाव सांगितला जातो.

महागाई का वाढत आहे?

महागाई का वाढत आहे, असे राहुल यांनी एका महिलेला विचारले. त्यावर महिलेने संतापाचा स्वरात सांगितले की, सरकार याकडे अजिबात लक्ष देत नाही. त्यांना केवळ आपल्या भाषणांचे देणेघेणे आहे. सर्वसामान्य लोक काय खाणार, यावर त्यांचे लक्ष नाही. आधी जी वस्तू 500 रुपयांना होती, आता ती 1000 रुपयांना मिळते. आता खर्च कमी करण्यासाठी त्यात कपात करावी लागेल. त्यामुळे आम्हाला त्रासच होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT