<div class="paragraphs"><p>O.P.Soni</p></div>

O.P.Soni

 

Sarkarnama

देश

आता काँग्रेसच्या मंत्र्यांनीच दिल्या मोदी जिंदाबादच्या घोषणा..!

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पंजाब (Punjab) दौऱ्यातील सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीवरून मोठा गदारोळ सुरू आहे. मोदींनी या कारणावरून दौरा अर्धवट सोडला होता. यावरून काँग्रेस (Congress) आणि भाजपमध्ये (BJP) आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. आता काँग्रेस नेते व उपमुख्यमंत्री ओ.पी.सोनी (O.P.Soni) यांनीच मोदी जिंदाबादच्या घोषणा दिल्याचे समोर आले आहे. याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

पंजाबचे उपमुख्यमंत्री ओ.पी.सोनी हे मोटारीतून अमृतसरला जात होते. त्यावेळी आंदोलन करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या मोटारीला अडवले. कार्यकर्त्यांनी मोटारीला घेराव घालून जय श्री रामच्या घोषणा देण्यास सुरवात केली. यानंतर सोनी यांनीही मोटारीतून डोके बाहेर काढून मोदी जिंदाबादच्या घोषणा देण्यास सुरवात केली. यामुळे भाजप कार्यकर्त्यांनाच धक्का बसला. काँग्रेसच्या मंत्र्यांनीच मोदींच्या नावाने घोषणा दिल्याने भाजप कार्यकर्ते मागे हटले. यानंतर अखेर सोनी मोटारीतून पुढे रवाना झाले.

पंजाबमध्ये मोदींच्या जिवाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप भाजपने केला आहे. पंजाबमधील काँग्रेस सरकारने जाणीवपूर्वक मोदींच्या सुरक्षाव्यवस्थेत त्रुटी ठेवल्याचा आरोपही भाजपकडून करण्यात आला होता. काँग्रेसने मोदींच्या सभेला गर्दी नसल्यानेच त्यांनी दौरा रद्द करून परत जाणे पसंत केले, असे म्हटले आहे. यावरून आता पंतप्रधानांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली असून, पंजाबमधील भाजप नेत्यांनी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची भेट घेतली आहे. यामुळे राजकीय हालचालींना वेग आल्याचे मानले जात आहे.

फिरोझपूरमध्ये पंतप्रधानांकडून काल (ता.5) विविध प्रकल्पांचे उदघाटन केले जाणार होते. दुपारी दीड वाजता हा कार्यक्रम नियोजित होता. त्यासाठी भाजपने जय्यत तयारीही केली होती. त्याआधी पंतप्रधान मोदी हुसेनवाला येथील राष्ट्रीय हुतात्मा स्मारक येथे हेलिकॉप्टरने जाणार होते. पण पावसाळी वातावरणामुळे त्यांनी रस्त्याने जाण्याचा निर्णय घेतला होता. भटिंडा येथून हा मार्ग दोन तासांचा होता.

पंजाब पोलिस महासंचालकांनी सुरक्षा व्यवस्थेची खात्री केल्यानंतर पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा हुसेनवालाच्या दिशेने निघाल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली. हुतात्मा स्मारकापासून 30 किलोमीटर अंतरावरील एका पुलावर वाहनांचा ताफा आल्यानंतर काही आंदोलकांनी रस्ता अडवल्याचे लक्षात आले. त्यामुळे पंतप्रधानांना सुमारे 20 मिनिटे तिथेच थांबावे लागेल. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील ही मोठी त्रुटी होती, असेही गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

पंतप्रधान मोदींचे वेळापत्रक आणि प्रवासाचे नियोजन पंजाब सरकारला आधीच कळवले होते. त्यानुसार राज्य सरकारने सुरक्षा व इतर बाबींची योग्य खबरदारी घेणे आवश्यक होते. सरकारने रस्त्यावरील इतर गोष्टी थांबवण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था पुरवणे अपेक्षित होते. पण तसे करण्यात आले नाही. सुरक्षा व्यवस्थेतील या त्रुटींमुळे पंतप्रधानांनी पुन्हा भटिंडा विमानतळाकडे जाण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT