Ashish Mishra
Ashish Mishra 
देश

मोठी बातमी : केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला न्यायालयाचा दणका

सरकारनामा ब्युरो

लखीमपूर खीरी : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे घडलेल्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्राने (Ashish Mishra) 3 ऑक्टोबरला शेतकऱ्यांना चिरडले होते. या प्रकरणी आशिषला अटक करण्यात आली असून, त्याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

या प्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे. आशिष मिश्रासह लव कुश, आशिष पांडे आणि भारती या चौघांना अटक झाली आहे. आशिषने न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. याचबरोबर आशिष पांडेचाही जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात प्रियांका गांधी, ए.के.अँटनी, मल्लिकार्जुन खर्गे, के.सी.वेणूगोपाल, गुलाम नबी आझाद आणि अधीर रंजन चौधरी या नेत्यांचा समावेश होता. या प्रकरणी निष्पक्षपणे चौकशी होण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी काँग्रेसने राष्ट्रपतींकडे केली. आरोपीचा पिताच जर केंद्रीय गृहराज्यमंत्री असेल तर या प्रकरणी न्याय मिळणार नाही, असे शिष्टमंडळाने राष्ट्रपतींना सांगितले. यावर राष्ट्रपतींनी केंद्र सरकारशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेली वर्षभरापासून शेतकरी शांततामय मार्गाने आंदोलन करीत आहेत. लखीमपूर खीरी येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे 3 ऑक्टोबरला गेले होते. त्यावेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री मिश्रा यांचा मुलगा आशिष आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली होती. याचवेळी ही घटना घडली होती. यात 8 जणांचा मृत्यू झाला असून, त्यातील 4 शेतकरी आहेत.

मिश्रा आणि मौर्य यांच्या मोटारींचा ताफा 3 ऑक्टोबरला तिकोनिया चौकातून जात असताना त्यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी शेतकरी धावले. त्याचवेळी ताफ्यातील दोन मोटारी त्या गर्दीत घुसल्या. त्यामुळे अनेक शेतकरी चिरडले गेले. ही घटना पाहताच शेतकरी आणखी संतप्त झाले. आंदोलक शेतकऱ्यांनी त्या दोन्ही गाड्यांना आग लावल्याचे सांगण्यात येते. या घटनेत एकूण आठ जणांचा मृत्यू झाला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT