Capital Delhi
Capital Delhi Sarkarnama
देश

अबब! दिल्ली बनले जगातील सर्वात प्रदूषित शहर

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : भारताची राजधानी दिल्ली (Capital Delhi) पुन्हा जगातील सर्वाधिक विषारी व प्रदूषित शहर (Polluted City) ठरले असून सर्वाधिक १० प्रदूषित शहरांत मुंबईचाही (Mumbai) समावेश झाला आहे. सर्वोच्च व उच्च न्यायालयाने (Supreme Court) अनुक्रमे केंद्र व दिल्ली सरकारकडून प्रदूषणाचा धोका कमी करण्याबाबतचा ठोस आणीबाणी कृती आराखडा मागितला आहे. ही हवा भयानक असून नागरिकांचा जीव वाचवायचा तर, पुन्हा लॉकडाऊन लावणे, वाहनांची गर्दी आवरणे व शाळा बंद ठेवणे यासारख्या सारख्या उपायांचा तत्काळ विचार करा, असे न्यायलयाने राज्य सरकारला सांगितले आहे.

दिल्लीत गेल्या २४ तासांत वायू गुणवत्ता सूचकांक (एक्यूआय) 556 अंकांच्या घातक पातळीवर पोहोचला. दिवाळीनंतर फटाके, नवीन बांधकामांमुळे उडणारी धूळ, लाखो वाहनांचा धूर व उत्तर प्रदेश, हरियाणासह शेजारच्या राज्यांतील शेतात काडीकचरा (पराली) जाळल्याने दिल्लीच्या हवेत मिसळणारा व विषारी बनणारा धूर यांचे प्रमाण सतत वाढत आहे. दिवाळीनंतर दिल्लीत सतत कुंद वातावरण आहे. धूर व धुके यांचे मिश्रण (स्मॉग) हवेत भरून राहिल्याने डोळे जळजळणे, श्वास घेण्यास त्रास होणे यासारख्या समस्या दिल्लीकरांना सर्रास भेडसावत आहेत. लहान मुलांचे तर आरोग्यच धोक्यात असून दर तीनामागे दिल्लीच्या एका बालकाला अस्थमा व गंभीर श्वसनविकार घेऊनच पुढचे आयुष्य काढावे लागेल असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

भारतातील सर्वांत १० प्रदूषित शहरांत उत्तर प्रदेशातील ५ शहरांचा समावेश आहे. दिल्ली सरकारच्या उपायांनी प्रदूषण कमी होत नाही हे पाहिल्यावर न्यायालयाने पुन्हा यात हस्तक्षेप केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले असून, दिल्लीची हवा इतकी गंभीर झाली आहे की आता घरात मास्क वापरण्याची वेळ आली तरी तुमच्याकडे या प्रदूषणावर ठोस उपाय काय हे सांगत का नाही असा सवाल उपस्थित केला आहे. 'फक्त परालीची सबब तुम्ही का सांगता? त्यामुळे केवळ काही टक्के प्रदूषण होते, इतर कारणांचे व त्यावरील उपायांचे काय, असे सरन्यायाधीश रमणा यांनी तीव्रपणे विचारले. ही विषारी हवा किमान कमी व्हावी यासाठी तुमच्याकडे काय आराखडा आहे? एक्यूआयची पातळी कमी करायची तर दोन तीन नव्हे तर योग्य व ठोस योजना सांगा असेही न्यायालयाने फटकारले.

दरम्यान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पर्यावरण मंत्री व वरिष्ठ अधिकाऱयांची तातडीची बैठक बोलावून प्रदूषण कमी करण्याबाबतच्या उपाययोजनांची माहिती घेतली. राज्य व केंद्र सरकार यांच्यातील आरोपांच्या टोलवाटोलवीत दिल्लीकरांचा जीवच पणाला लागल्याबद्दल पर्यावरण तज्ज्ञांनी नाराजी व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाशी संबंथित 'आयक्यू-एयर' या गटाने जी नवी यादी जारी केली त्यात दिल्लीबरोबरच मुंबई व कोलकत्याचाही समावेश आहे. लाहोर व चीनमधील चेंदगू शहरेही यात आहेत.

जगातील सर्वाधिक विषारी हवेची शहरे (एक्यूआयमध्ये)

दिल्ली, भारत- ५५६

लाहोर, पाकिस्तान - ३५४

सोफिया, बुल्गारिया - १७८

कोलकता, भारत - १७७

जगरेब, क्रेएशिया - १७३

मुंबई, भारत - १६९

बेलग्रेड, सर्बिया व चेंगदू, चीन - प्रत्येकी १६५

क्पोपजे, नॉर्थ मॅसेडेलिया - १६४

क्राको, पोलंड - १६०

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT