Power Crisis
Power Crisis Sarkarnama
देश

राजधानीत विजेचं संकट गडद; रुग्णालयांना दिला सतर्कतेचा इशारा

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : कोळशाच्या टंचाईमुळे (Coal Shortage) महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्यांवर वीजटंचाईचे (Power Crisis) संकट घोंघावत आहेत. राजधानी दिल्लीतही हे संकट अधिक गडद होत चालले असून सरकारने रुग्णालये, मेट्रो सेवेसह सर्व महत्वाच्या आस्थापनांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, गुजरात, पंजाबसह अन्य काही राज्यांमध्येही वीज टंचाई निर्माण झाली आहे. (Coal Shortage News Update)

दिल्ली (Delhi) सरकारने गुरूवारी केंद्र सरकारला पत्र लिहून पुरेसा कोळसा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. ऊर्जा मंत्री सत्येंद्र जैन यांनी तातडीची बैठक घेत स्थितीचा आढावा घेतला. या बैठकीनंतर दोन ऊर्जा प्रकल्पांमध्ये कोळशाच्या टंचाईमुळे ऊर्जा निर्मितीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे पुढील 24 तासांत महत्वाच्या संस्था, दिल्ली मेट्रो, सरकारी रुग्णालयांमध्ये वीज टंचाई निर्माण होऊ शकते, असं सरकारनं स्पष्ट केलं आहे.

दिल्लीतील 25 ते 30 टक्के ऊर्जा पुरवठा या प्रकल्पांमधून होतो. तिथे कोळशाची टंचाई जाणवत असल्याचे जैन यांनी सांगितले. सरकारकडून सातत्याने स्थितीचा आढावा घेतला जात असून आवश्यक पावले उचलली जात आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. पंजाबमध्ये शेतकऱ्यांना फटका बसू लागला असून किसान मजदूर संघर्ष समितीकडून शुक्रवारी ऊर्जा मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन केले जाणार आहे. पंजाबमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत यावेळी विजेच्या मागणीत 40 टक्के वाढ झाली आहे.

उत्तर प्रदेशातही कोळशाची टंचाई आहे. राज्यात केवळ 25 टक्के कोळशाच्या साठा उरला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उन्हाळा वाढल्याने एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच विजेची मागणी वाढली. त्यामुळे आता कोळशाची टंचाई निर्माण झाली आहे. देशात मागील 38 वर्षांत पहिल्यांदाच एप्रिल महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात विजेची मागणी वाढली आहे. ऑक्टोबर महिन्यातही कोळशाच्या टंचाईमुळे देशात विजेचे संकट निर्माण झाले होते.

राजस्थान सरकारने अनेक भागांत भारनियमनाची घोषणा केली आहे. ग्रामीण भागात तीन तास तर जिल्ह्याच्या ठिकाणी दोन तासाचे भारनियमन केले जात आहे. देशभरात कोळशाची टंचाई निर्माण झाली आहे. आम्ही प्रति युनिटला पंधरा रुपये देत असलो तरी वीज मिळत नाही, अशी माहिती राजस्थानचे ऊर्जा मंत्री भंवर सिंग भट्टी यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT