Delhi CM Arvind Kejriwal Sarkarnama
देश

Supreme Court : निवडणुकीआधी केजरीवालांना अटक का? ईडीच्या टायमिंगवर कोर्टाचे चार प्रश्न

Rajanand More

New Delhi News : दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तिहार तुरुंगात आहेत. आपली अटक बेकायदेशीर असल्याची याचिका त्यांच्याकडून सुप्रीम कोर्टात (Supreme Court) दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज झालेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने ईडीला अटकेसंदर्भात सहा प्रश्न विचारले आहेत. लोकसभा निवडणुकीआधी झालेल्या अटकेबाबत आणि ईडीच्या टायमिंगबाबत कोर्टाने ईडीकडे विचारणा केली आहे.

सुप्रीम कोर्टात केजरीवालांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांच्याकडून बाजू मांडली जात आहे. सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी स्वतंत्रता महत्त्वाची असून, त्याला कुणीच नाकारू शकत नाही, असे सांगत ईडीच्या (ED) टायमिंगवर प्रश्न उपस्थित केला. लोकसभा निवडणुकीआधीच (Lok Sabha election 2023) केजरीवालांना अटक का केली, असा सवाल कोर्टाने उपस्थित केला. 

केजरीवालांना (Arvind Kejriwal) जाणीवपूर्वक लोकसभा निवडणुकीआधी अटक करण्यात आल्याचा दावा कोर्टात करण्यात आला आहे. मद्य घोटाळा प्रकरणाचा तपास सुरू होणे, गुन्हा दाखल करणे, केजरीवालांकडून उत्तर मागणे आणि त्यांना अटक करणे यादरम्याच्या कालावधीच्या अनुषंगाने कोर्टाने ईडीकडून उत्तर मागवले आहे. त्याचे उत्तर शुक्रवारी (ता. ३ मे) दुपारपर्यंत द्यावे लागणार आहे.

 (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोर्टाने उपस्थित केले चार प्रश्न

  1. लोकसभा निवडणुकीआधी अटक का?

  2. न्यायिक कारवाईशिवाय जे काही झाले आहे, त्यासंदर्भात गुन्हेगारी कारवाई सुरू केली जाऊ शकते का?

  3. प्रकरणात केजरीवालांचा सहभाग कसा हे सांगा?

  4. कारवाई सुरू होणे आणि त्यानंतर अटक यामध्ये इतके अंतर का?

कथित मद्य धोरणातून (Delhi Liquor Scam Case) मिळालेला पैसा गोव्यातील निवडणुकीत वापरण्यात आल्याचा दावा ईडीने केला आहे. त्यावरही आज कोर्टाने सिंघवी यांना प्रश्न विचारले. गोवा निवडणुकीची तारीखा काय होती, धोरण कधी तयार झाले आणि लागू कधी झाले, असे प्रश्न कोर्टाने विचारले. त्यावर सिंघवी यांनी हे धोरण 2021 मध्ये तयार झाले आणि त्यानंतर वर्षभराने अंमलबजाणी सुरू झाल्याचे सांगितले.

21 मार्चपासून तुरुंगात

केजरीवाल यांना ईडीने 21 मार्चला अटक केली आहे. तिहार जेलमध्ये ते 1 एप्रिलपासून आहेत. त्यांना 7 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. केजरीवालांनी दिल्ली हायकोर्टातही अटकेविरोधात याचिका दाखल केली होती. मात्र, ही अटक योग्यच असल्याचा निकाल देत हायकोर्टाने केजरीवालांची याचिका फेटाळून लावली होती. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टात तरी दिलासा मिळणार का, याकडे लक्ष लागले आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT