Utpal Parrikar, Manohar parrikar and Devendra Fadnavis
Utpal Parrikar, Manohar parrikar and Devendra Fadnavis Sarkarnama
देश

उत्पल पर्रीकरांचा पत्ता कट? फडणवीसांनी हात झटकल्याने चर्चेला उधाण

सरकारनामा ब्युरो

पणजी : गोव्यात (Goa) पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमुळे (Assembly Election) राजकारण पेटले आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील (BJP) मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांनी पक्षाला थेट इशारा देत उमेदवारी मागितली आहे. यावर गोव्याचे प्रभारी व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी वेगळेच संकेत दिल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

उत्पल पर्रीकर यांच्या उमेदवारीबद्दल विचारले असता फडणवीस म्हणाले की, मनोहर पर्रीकरांनी गोव्यात भाजपला प्रस्थापित करण्यासाठी भरपूर काम केलेले आहे. मात्र, केवळ त्यांचा अथवा एखाद्या नेत्याचा मुलगा आहे म्हणून भाजपमध्ये तिकीट मिळत नाही. त्यांचे कर्तृत्व असेल तरच त्यांचा विचार होतो. त्यामुळे याबाबतचा निर्णय मी घेऊ शकत नाही. पक्षाचे संसदीय मंडळ याबाबत निर्णय घेईल.

फडणवीस यांनी उत्पल पर्रीकर यांच्या उमेदवारीबाबत हात झटकल्याचे मानले जात आहे. त्यांच्या या विधानानंतर पर्रीकर यांचा भाजपकडून पत्ता कट होण्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता त्यांना तिकिट न देता भाजपकडून दुसरे काय मिळणार, याकडे लक्ष लागले आहे. याचवेळी उत्पल पर्रीकर तिकिट न मिळाल्यास काय भूमिका घेतात, याकडेही सगळ्यांचे लक्ष आहे.

पर्रीकर हे गोव्याचे मुख्यमंत्री होते तसेच, संरक्षण मंत्रीही होते. त्यांच्या मृत्यूने गोव्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. पर्रीकर हे तब्बल 25 वर्षे पणजी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत होते. आता मतदारसंघावर त्यांचे पुत्र उत्पल यांनी दावा सांगितला आहे. पणजीत मागील दोन महिन्यांपासून ते प्रचार करीत आहेत. त्यांनी मागील आठवड्यात पक्ष नेतृत्वाला थेट धमकीवजा इशारा दिला आहे. आता मागे वळून पाहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. यामुळे गोवा भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.

पणजीच्या जागेवर सध्या भाजपचे आमदार बाबूश मोन्सेरात आहेत. मोन्सेरात यांनी 2017 मध्ये विधानसभा निवडणूक तेथून लढवली होती परंतु, त्यांचा पराभव झाला होता. नंतर 2019 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या 10 नेत्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. नंतर पर्रीकर यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत त्यांनी पणजीवर विजय मिळवला होता. ते आता जागेवर पुन्हा दावा सांगत आहेत. याला उत्पल पर्रीकर यांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे उत्पल यांनी मोर्चेबांधणी करीत पक्ष नेतृत्वावर दबाव टाकण्यास सुरवात केली आहे. यासाठी त्यांनी नुकतीच पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचीही भेट घेतली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT