Khaleda Zia, Narendra Modi, Sheikh Hasina Sarkarnama
देश

Khaleda Zia : शेख हसीना यांनी भारताचंही टेन्शन वाढवलं; खालिदा जिया यांची मुक्तता...

Rajanand More

New Delhi : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला आहे. तर दुसरीकडे चीनच्या समर्थक मानल्या जाणाऱ्या माजी पंतप्रधान खालिदा जिया यांची मुक्तता करण्यात आली आहे. त्यामुळे शेख हसीना यांचे पलायन भारतासाठी टेन्शन वाढवणारे ठरणार का, याबाबत चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे.

खालिदा जिया आणि शेख हसीना या कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. 2007 मधील देशातील निवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर सत्तेत आलेल्या काळजीवाहू सरकारने खालिदा जिया यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. याचप्रकरणात त्यांना 2018 मध्ये शिक्षा सुनावण्यात आली होती. तेव्हापासून त्या जेलमध्येच होत्या.

बांगलादेशमध्ये सरकारी नोकरीतील आरक्षण रद्द करण्याच्याविरोधात काही दिवसांपासून देशात विद्यार्थ्यांनी मोठे आंदोलन उभे केले. हे आंदोलन सरकारविरोधी बनत गेल्यानंतर देशात मोठी हिंसा सुरू झाली. त्यानंतर सोमवारी हसीना यांनी पलायन करत भारतात आश्रय घेतला. त्यानंतर राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी खालिदा जिया यांच्या सुटकेचे आदेश दिले. त्यांची मंगळवारी सुटका करण्यात आली आहे.

खालिदा जिया यांना पाकिस्तान आणि चीनच्या कट्टर समर्थक मानल्या जातात. त्या पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकतात, अशी जोरदार चर्चा आहे. त्यामुळे बांगलादेशमधील सध्याच्या राजकीय स्थितीत खालिदा जिया यांच्याकडे सत्तेच्या चाव्या गेल्यास भारतासाठी ही धोक्याची घंटा असेल, असे मानले जात आहे. त्या बांगलादेशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाच्या प्रमुख आहेत.

खालिदा जिया यांना घरातच नजरकैदेत ठेवण्यात आले होते. भ्रष्टाचार प्रकरणात त्यांना 17 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. राष्ट्रपतींच्या आदेशानंतर त्यांची मुक्तता झाली आहे. त्या 78 वर्षांच्या आहेत. त्यांचा जन्म 15 ऑगस्ट 1945 रोजी बंगालमधील जलपाईगुडी येथे झाला होता.

पती जियाउर रहमान यांच्या हत्येनंतर त्यांची राजकारणा एन्ट्री झाली. जियाउर रेहमान हे 1977 ते 1981 या कालावधी बांगलादेशचे राष्ट्रपती होते. त्यांनी 1978 मध्ये राजकीय पक्षाची स्थापना केली होती. पतीच्या मृत्यूनंतर खालिदा जिया 1991 मध्ये देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या. त्यानंतर 2001 ते 2006 या कालावधीतही त्यांनी हे पद सांभाळले. 2007 च्या निवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर देशात काळजीवाहू सरकार अस्तित्वात आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT