Best Bakery case :
Best Bakery case : Sarkarnama
देश

Best Bakery case : बेस्ट बेकरी प्रकरणाची सुनावणी तहकूब..; कारण काय?

सरकारनामा ब्यूरो

Best Bakery case : बेस्ट बेकरी केस प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात (Mumbai Court) आज सुनावणी होणार होती. पण आजची सुनावणी तहकूब करण्यात आली. या पुढची सुनावणी ३१ मे २०२३ रोजी होणार आहे. या प्रकरणातील दोन फरार आरोपीं विरोधात मुंबई सत्र न्यायालयातील नुकताच खटला पूर्ण झाला आहे. त्यावर न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे.

गुजरातमधील वडोदरा इथे 2002 मध्ये गोध्रा हत्याकांडानंतर उसळलेल्या हिसांचारातील एक गाजलेलं प्रकरण म्हणजे बेस्ट बेकरी हत्याकांड.1 मार्च 2002 रोजी रात्री 8 वाजता गुजरातमधील वडोदरा शहरातील बेस्ट बेकरीला (Best Bakery case) दंगलखोरांनी लुटले आणि नंतर आग लावली. या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला होता. (Gujrat News)

बेस्ट बेकरीला लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या 14 जणांमध्ये हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समुदायातील लोकांचा समावेश होता. या प्रकरणी वडोदरा शहर पोलिसांनी या प्रकरणाची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि बेकरी मालकाची मुलगी जहिरा शेख यांच्या तक्रारीच्या आधारे एफआयआर नोंदवला होता. बेस्ट बेकरी प्रकरणात सुरुवातीला एकूण 21 आरोपी करण्यात आले होते.

बेस्ट बेकरी प्रकरणात 9 जणांना दोषी

हा खटला गुजरातमध्ये न चालवता दुसऱ्या राज्यात चालवा, अशी मागणी जाहिरा शेख यांनी सर्वोच्च न्यायालयात केली. त्यानंतर 12 एप्रिल 2004 रोजी सर्वोच्च न्यायालयाने हा खटला मुंबईला वर्ग करून हा खटला नव्याने चालवण्याचे आदेश दिले. 4 ऑक्टोबर 2004 पासून मुंबई न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर 24 फेब्रुवारी 2006 रोजी बेस्ट बेकरी प्रकरणातील 9 आरोपींना दोषी ठरवण्यात आले, तर 8 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सर्व 9 दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील 4 फरार आरोपींना 2013 साली पकडण्यात आले होते. (Crime News)

मुंबई उच्च न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवली

कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. पुढील अनेक वर्षे मुंबई उच्च न्यायालयात खटला चालला. ९ जुलै २०१२ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने संजय ठक्कर, बहादूर सिंग चौहान, सना भाई बारिया आणि दिनेश राजभर या चार दोषींची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली, तर इतर ५ आरोपी राजू बारिया, पंकज गोसावी, जगदीश राजपूत आणि सुरेश उर्फ ​​लालू, शैलेश तडवी यांना निर्दोष मुक्त करण्यात आले.

याप्रकरणी नंतर पकडलेल्या चार फरार आरोपींचा खटला मुंबईच्या विशेष न्यायालयात सुरू आहे. चार आरोपींपैकी दोघांचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणातील दोन आरोपी हर्षद रावजीभाई सोळंकी आणि मफत मणिलाल गोहिल हे तुरुंगात असून मुंबईतील विशेष न्यायालय सुनावणी पार पडली. आज या प्रकरणावर निर्णय़ होणार होता. पण न्यायालयाने आज होणारी सुनावणी ३१ मे पर्यंत तहकूब केली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT