Digvijay Singh, P.Chidambaram and Salman Khurshid
Digvijay Singh, P.Chidambaram and Salman Khurshid  Sarkarnama
देश

खुर्शीद यांच्या पुस्तकावर उच्च न्यायालय म्हणालं, पटत नसेल तर वाचू नका!

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद (Salman Khurshid) यांच्या अयोध्या प्रकरणाच्या निकालावर भाष्य करणाऱ्या नव्या पुस्तकावरून वाद उफाळला आहे. त्यांनी हिंदुत्वाची (Hindutva) तुलना इसिस (ISIS) व बोको हराम (Boko Haram) यासारख्या दहशतवादी संघटनांशी केल्याने या पुस्तकावर बंदीची मागणी करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने (High Court) आज ही मागणी फेटाळून लावत अशी मागणी करणाऱ्यांना फटकारले.

‘सनराइज ओव्हर अयोध्या’ या खुर्शीद यांच्या पुस्तकावरून हा वाद सुरू झाला होता. या पुस्तकावर बंदी घालावी, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली होती. न्यायालयाने आज ही याचिका फेटाळून लावली. या वेळी न्यायालय याचिकाकर्त्याला म्हणाले की, तुम्हीच हे पुस्तक खरेदी करू नका अथवा वाचू नका, असे लोकांना का सांगत नाही? सगळ्यांना सांगा हे पुस्तक चांगले लिहिले नसून, ते वाचू नका. तुमच्या भावना दुखावत असतील तर दुसरे काही तरी चांगले वाचा. लोक जर एवढे संवेदनशील असतील तर आम्ही काय करू शकतो. तुम्हाला हे पुस्तक कुणीही वाचायला सांगितलेले नाही.

दरम्यान, विवेक गर्ग या वकीलाने खुर्शीद यांच्या विरोधात दिल्लीच्या पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. याचबरोबर शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी या मुद्द्यावर खुर्शीद यांना फटकारले होते. त्यांनी म्हटले होते की, ही लज्जास्पद तुलना आहे. वसुधैव कुटुंबकम हा मंत्र देणाऱ्या हिंदू धर्माबद्दल अशा अर्ध्या कच्च्या माहितीमुळे या पुस्तकाला प्रसिध्दी मिळू शकेल पण कोट्यवधी हिंदूंच्या भावना त्यामुळे दुखावल्या गेल्या आहेत.

भाजपने खुर्शीद यांच्यावर हल्लाबोल केला होता. यासाठी केंद्रीय मंत्री मुख़्तार अब्बास नक्वी, महेंद्रनाथ पांडे, सोशल मीडिया विभागाचे अमित मालवीय, प्रवक्ते गौरव भाटिया, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा व मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा अशी नेतेमंडळी मैदानात उतरली होती. नक्वी यांनी म्हटले होते की, काँग्रेस नेत्यांच्या अज्ञानाचे हे प्रदर्शन आहे. स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवतात पण त्यांना हिंदुत्वाची माहिती नाही. कधी तालिबान तर कधी दहशतवादी गट हा यांचा महामूर्खपणा आहे.

वादास कारण ठरली एक ओळ

खुर्शीद यांच्या पुस्तकातील 1500 व्या पानावरील अक्षरशः एका ओळीवरून हा वाद उफाळला आहे. ती ओळ अशी - भारतातील साधू-संत शतकांपासून जो सनातन धर्म व मूळ हिंदुत्वाची चर्चा करत आहेत त्याला आज कट्टर हिंदुत्वाआडून बाजूला सारले जात आहे. आज हिंदुत्वाची अशी राजकीय आवृत्ती काढली जात आहे जी इसिस व बोको हराम या इस्लामी जिहादी संघटनांशी साधर्म्य सांगते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT