Uddhav Thackeray, Bhagt Sigh Koshyari
Uddhav Thackeray, Bhagt Sigh Koshyari Sarkarnama
देश

Maharashtra's Political Crisis : ठाकरेंना राजीनामा देऊ नका म्हणत होतो; भगतसिंह कोश्यारींचा खळबळजनक दावा

सरकारनामा ब्यूरो

SC Final Decision on Shiv Sena : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः राजीनामा दिल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करता आले असते, असे निरीक्षण नोंदविले. तत्कालीन राज्यपालांच्या भूमिकेवरही न्यायालयाने ताशेरे ओढले. दरम्यान, मी जे काही केले ते विचारपूर्वक आणि परिस्थितीला धरूनच केले, असे म्हणत राज्याचे माजी राज्यापाल भगतसिंह कोश्यारी यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत खळबळजनक दावा केला आहे.

दिल्ली येथे कोश्यारी यांनी प्रशारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांना महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत प्रश्न विचारण्यात आले. न्यायालयाने माजी राज्यपाल कोश्यारी यांनी घेतलेल्या निर्णयांवर ताशेरे ओढले आहेत. राज्यापालांनी बहुमत सिद्ध करण्यास सांगितले हेच चुकीचे केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना शपथ घेण्यासाठी पाचारण करण्यावरही न्यायालयाने आक्षेप घेतला.

त्याबाबत विचारले असता कोश्यारी म्हणाले, "राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्वतः राजीनामा दिला. त्यावेळी त्यांना मी राजीनामा देऊ नका, असे सांगत होतो. मात्र त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी पाचारण केले. मी तत्कालीन परिस्थितीला धरून विचारपूर्वक निर्णय घेताल. ठाकरे यांनी स्वतः राजीनामा दिल्याने मला वाटते इतर गोष्टींना जास्त महत्व राहत नाही. त्याला काही अर्थ उरत नाही."

मी कायद्याचा जाणकार नाही, जे झाले ते झाले. आता मी न्यायालयाच्या निर्णयावर काही बोलणार नसल्याची ठाम भूमिका कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी घेतली. कोश्यारी म्हणाले, "आता कोर्टाला घडलेल्या घटनांचे निरीक्षण नोंदवून व्याख्या करण्याचा अधिकार आहे. त्यावर मी काय बोलणार. त्यांनी काय व्याख्या केली यात मी पडू शकत नाही. मी काही कायद्याचा जाणकार नाही. मात्र ठाकरे यांनी स्वतः राजीनामा दिला. तो निर्णय कोर्टाही फिरवू शकत नाही, मग मी तरी काय करू शकलो असतो?"

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल गुरुवारी (ता. ११) जाहीर झाला. यामध्ये न्यायालयाने तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे बहुमत चाचणी बोलवण्यासाठी कोणतेही योग्य कागदपत्रे नव्हती. त्यामुळे राज्यापालांनी उद्धव ठाकरे यांना बहुमताच्या चाचणीचे आदेश देणे हे बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाने सांगितले. राज्यापालांची कृती ही बेकायदेशीर होती, राज्यापालांची भूमिका योग्य नाही. एकनाथ शिंदे यांनी व्हिप म्हणून जी भरत गोगावले यांची नियुक्ती केली तीही न्यायालयाने बेकायदेशीर ठरवली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT