Devendra Fadnavis-Uddhav Thackeray
Devendra Fadnavis-Uddhav Thackeray Sarkarnama
देश

मूड महाराष्ट्राचा : आज निवडणूका झाल्यास जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कोण?

सरकारनामा ब्युरो

मुंबई : आज निवडणूका झाल्यास महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कोण या प्रश्नाचे उत्तर सर्वेक्षणातून समोर आले आहे. महाविकास आघाडीला सत्तेत येऊन दोन वर्षे झाली आहेत. आज जर निवडणूका झाल्यास परिस्थिती काय असेल? याचा कल 'सकाळ-साम'ने केलेल्या सर्वेक्षणातून जाणून घेतला आहे. यात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या एकूण कामाबद्दल तब्बल ६८.३ टक्के जनता सकारात्मकता आहे. तर १३.८ टक्के जनताच त्यांच्या कामाबद्दल निराशा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची बळकट करणारा हा कल आहे.

ठाकरे कुटुंबातील थेट निवडणूकीच्या राजकारणात उतरलेल्या व्यक्ती म्हणजे उद्धव ठाकरे. ते थेट मुख्यमंत्री झाले आणि जनतेच्या मनात त्यांनी विशेषतः कोरोना काळात चांगले स्थान मिळविले. २९.७ टक्के लोकांनी त्यांना पसंती दिली आहे.

तर दूसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दुसऱ्या क्रमांकाचा कौल जातो. त्यांना २२.४ टक्के लोकांनी पसंती दर्शविली आहे. भाजपला मिळालेला एकूण कौल सकारात्मक असणे आणि विरोधी पक्षनेते म्हणून कामगिरीबद्दल असमाधान असतानाही फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाबद्दल सर्वसाधारण सकारात्मकता आहे. भाजपच्याच पंकजा मुंडे यांचे नावही सर्व्हेक्षणात पुढे आले आहे. राष्ट्रवादीतून अजित पवार यांना सर्वाधिक पसंती आहे आणि त्यानंतर सुप्रिया सुळे यांना. राष्ट्रवादीत अजित पवार आणि सुप्रिया सुळे असे गट असल्याची चर्चा असते. ती चर्चा सर्व्हेक्षणात उमटली आहे.

महाविकास आघाडीचा सर्वांत मोठा लाभ उद्धव ठाकरे यांना झाला. मुख्यमंत्रीपद या पदावरून ते हाताळत असलेला कोविड १९ च्या उपाययोजना, त्यांची मृदू-मध्यमवर्गीय-घरातील कर्त्या व्यक्तिची प्रतिमा या साऱ्यांचा आजच्या महाविकास आघाडीच्या प्रतिमेवर सकारात्मक प्रभाव आहे. या प्रभावाचा शिवसेनेला प्रत्यक्ष मतदानात कितपत लाभ होईल, याविषयी मतदारांमध्ये साशंकता आहे; तथापि ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद उत्तम सांभाळले असल्याचे प्रशस्तिपत्रक जनता त्यांना जरूर देते आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी प्रादेशिक पक्ष आहेत. विदर्भ वगळता अन्यत्र त्यांच्या वाढीला महाविकास आघाडी हीच मर्यादा आहे. ती मर्यादा पाळली नाही, तर या दोन्ही पक्षांच्या वाढीचा फटका काँग्रेसला बसणार आहे. काँग्रेसचे अवकाश देशभर संकुचित होत असताना महाराष्ट्र ही पक्षाची मोठी आशा आहे. या परिस्थितीत काँग्रेस आपले अवकाश कसे कायम राखणार हा प्रश्न उभा राहणार आहे. महाविकास आघाडी म्हणून संघटितपणे उभे राहण्याचा लाभ तीनमधील दोन पक्षांना सर्वाधिक होत असताना काँग्रेस अल्प लाभावर कसे समाधान मानणार, यावर महाविकास आघाडीचे भविष्य अवलंबून आहे. काँग्रेसशिवाय महाविकास आघाडी ही संकल्पना जनतेला मान्य दिसत नाही.

भाजप आणि काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहेत. या दोन्ही पक्षांच्या भूमिका देशपातळीवरच्या आहेत; मात्र त्यांना राज्याच्या गरजेनुसारही भूमिका घ्याव्या लागणार आहेत. भाजपमागे सत्तेपासून अंतरावर राहणारे बहुमत असणे आणि काँग्रेस स्वबळावर सत्तेत येणे दुरापास्त असणे असे आजचे वातावरण आहे. अशा वातावरणात दोन्ही पक्षांनी राज्यासाठी काही स्वतंत्र भूमिका घ्यावी, अशी जनतेची अपेक्षा आहे. राष्ट्रीय पक्षांना प्रादेशिक पक्षांशी युती-आघाडी करून होणारा लाभ नव्याने तपासून घ्यावा लागणार आहे. या लाभाचे अल्पकालीन आणि दीर्घकालीन लाभही नव्याने अभ्यासावे लागणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT