Tripura new cabinet minsters
Tripura new cabinet minsters  
देश

सहकारी पक्षाच्या प्रमुखांशी पंगा महागात! थेट मंत्रिमंडळातून मिळाला डच्चू

सरकारनामा ब्युरो

आगरतळा : त्रिपुराच्या (Tripura) मुख्यमंत्रिपदाची धुरा आता डॉ.माणिक साहा (Manik Saha) यांनी हाती घेतली आहे. भाजपने (BJP) मुख्यमंत्री विप्लवकुमार देव यांना डच्चू दिला असला तरी जुनंच मंत्रिमंडळ कायम ठेवलं. भाजपने केवळ एका मंत्र्याला मंत्रिमंडळातून वगळलं आहे. याचवेळी जुन्या मंत्रिमंडळातील दहा जणांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. राज्यपालांनी आज या 11 कॅबिनेट मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

नवीन मंत्र्यांना राज्यपाल एस.एन.आर्य यांनी शपथ दिली. भाजपच्या नऊ आणि सहकारी पक्ष असलेला इंडिजिनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा (IPFT) या पक्षाच्या दोन जणांचा आज शपथविधी झाला. यात जिष्णू देव वर्मा, एन.सी.देववर्मा, रतनलाल नाथ, प्राणजित सिंघा रॉय, मनोज कांती देव, संताना चकमा, राम प्रसाद पॉल, भगवान दास, सुशांत चौधऱी, रामपद जमातिया आणि प्रेम कुमार रिआंग यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.

मंत्रिमंडळातून केवळ मेवर कुमार जमातिया यांना वगळण्यात आलं आहे. सरकारमधील घटक पक्षाच्या प्रमुखांशी पंगा घेणं त्यांना महागात पडलं आहे. आदिवासी कल्याण खात्याचे मंत्रिपद आधी त्यांच्याकडं होतं. पण त्यांचा आणि आयपीएफटीचे प्रमुख एन.सी.देववर्मा यांच्याशी वाद झाला होता. त्यामुळं त्यांना मंत्रिपद गमावावं लागलं आहे. त्यांच्या जागी भाजपचे ज्येष्ठ आदिवासी नेते रामपद जमातिया आणि आयपीएफटीचे आमदार प्रेमकुमार रिआंग यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे.

त्रिपुरात भाजप सत्तेत आल्यानंतर विप्लवकुमार देव (Biplab Kumar Deb) यांच्या खांद्यावर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांनी 14 मे रोजी तडकाफडकी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. नवीन मुख्यमंत्री निवडण्यासाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून विनोद तावडे (Vinod Tawde) आणि भूपेंद्रकुमार यादव राज्यात दाखल झाले होते. यानंतर पक्षाच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीत नवीन मुख्यमंत्र्यांची निवड करण्यात आली. मुख्यमंत्री म्हणून डॉ. माणिक साहा यांच्या नावावर या बैठकीत शिक्कामोर्तब झालं होतं. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर पक्षाने हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.

त्रिपुरात पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक (Assembly Election) होत आहे. निवडणुकीला सुमारे वर्षभराचा कालावधी असतानाच मुख्यमंत्रिपदावरून देव यांना हटवण्यात आलं. राज्यातील भाजपमध्ये गटबाजी उफाळून आल्यानं पक्ष नेतृत्वानं हे पाऊल उचललं आहे. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी देव यांना दिल्लीला पाचारण करण्यात आलं होतं. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्याशी त्यांनी चर्चा केली होती. त्याचवेळी देव यांच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब झालं होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT