Jharkhand students protest : झारखंडची राजधानी रांचीमध्ये परीक्षा घोटाळ्याच्या आरोपांविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागल्याचे समोर आले आहे. गेल्या 17 दिवसांपासून विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी झारखंड विधानभवनावर मोर्चा काढला. मात्र, आंदोलकांना रोखण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी बॅरिकेट्स हटवून पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज आणि पाण्याचा मारा केला.
JPSC आणि JSSC भरती परीक्षांमध्ये कथित अनियमितता, पेपर लीक आणि भरती प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप विद्यार्थी करत आहेत. या प्रकरणाची CBI चौकशी करावी, परीक्षांमध्ये पारदर्शकता आणावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी प्रमुख मागणी आंदोलकांची आहे. गेल्या काही दिवसांपासून रांचीतील जयपाल सिंह मुंडा स्टेडियम हे आंदोलनाचे प्रमुख केंद्र बनले आहे.
विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विधानभवन परिसरात सुमारे 1500 सुरक्षा जवान तैनात करण्यात आले होते. परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचीही मदत घेतली जात होती. विधानभवनाच्या 750 मीटर परिसरात कलम 163 लागू करण्यात आले होते. त्यामुळे रांचीतील वातावरण चांगलेच तापले होते.
देवेंद्र नाथ महतो यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचा हा विधानभवन घेराव मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी बॅरिकेट्स लावून आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्यार्थी मोठ्या संख्येने पुढे सरसावले. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर पाण्याचा फवारा मारला. तरीही विद्यार्थ्यांनी माघार न घेता दुसऱ्या मार्गाने विधानभवनाकडे जाण्याचा प्रयत्न केला. अखेर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला.
दरम्यान, झारखंड सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्याचा दावा केला आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी हा दावा फेटाळून लावला असून त्यांच्या प्रमुख मागण्यांवर अद्याप समाधानकारक निर्णय झालेला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सरकार आणि विद्यार्थी यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र झाल्याचे चित्र रांचीमध्ये पाहायला मिळत आहे.
लाठीचार्जनंतर एका विद्यार्थी आंदोलकाने पोलिसांवर गंभीर आरोप केले. त्याने म्हटलं, "विद्यार्थी आंदोलकांवर अतिशय अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला आहे. लाठीचार्ज हा कमरेच्या खाली केला पाहिजे. आमच्या डोके, हात, चेहरा, शरीराच्या इतर भागांवर मारहाण केली आहे. हा सरकारचा दुपट्टीपणा आहे."
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे झारखंडमधील राजकीय वातावरणही तापले आहे. परीक्षा घोटाळ्याच्या आरोपांवरून सुरू झालेल्या विद्यार्थी आंदोलनाला आता विधानभवन मार्च, पोलिसांचा लाठीचार्ज आणि सरकारविरोधातील नाराजी यामुळे मोठे स्वरूप प्राप्त झाले आहे. रांचीतील पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.