कोलकता : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्याने तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संताप व्यक्त करीत त्यांचे भाषण थांबवले होते. पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये कुरघोडीचे राजकारण रंगले आहे. या प्रकरणी ममतांच्या पाठीशी त्यांचे कट्टर विरोधक असलेल्या डाव्यांसह काँग्रेस उभी राहिल्याचे चित्र आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ जयंतीनिमित्त 23 जानेवारील पश्चिम बंगालध्ये राजकीय मानापमान नाट्य रंगले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत व्हिक्टोरिया मेमोरिअलमध्ये झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सहभागी झाल्या होत्या. त्या बोलत असताना उपस्थितांमधून जय श्रीरामची घोषणाबाजी झाल्याने त्या संतापल्या होत्या. पंतप्रधानांसमोरच त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत भाषण थांबवले होते.
यावरुन ममतांच्या पाठीशी त्यांचे कट्टर विरोधक असलेले डावे उभे राहिले आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते मोहम्मद सलिम म्हणाले की, त्यांनी भाषण करण्यास नकार देऊन योग्य भूमिका घेतली आहे. त्या का बोलल्या नाहीत? कारण भाजपने सरकारच्या पैशाने कार्यक्रम करुन त्याला पक्षीय स्वरुप दिले होते. चूक हे चूकच असते. बंगालमध्ये अशा चुकीच्या गोष्टी त्यांच्याकडून सुरू आहेत.
यावर काँग्रेसचे नेते अधीररंजन चौधरी यांनी म्हटले आहे की, पंतप्रधानांनी अशा प्रकारच्या गोष्टींना संमती देऊन पदाची अप्रतिष्ठा केली आहे. ममता बॅनर्जींचा अपमान करण्याचा अधिकार कोणालाच नाही, कारण त्या आमच्या मुख्यमंत्री आहेत. बंगालच्या संस्कृतीवर हिंदू धर्मांधांनी केलेला हा हल्ला आहे. हे बंगालवरील धार्मिक आणि राजकीय आक्रमण आहे.
व्हिक्टोरिया ममोरियलमध्ये झालेल्या कार्यक्रमात ममता या बोलण्यासाठी उभ्या राहिल्यानंतर त्या काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, गर्दीतून जय श्रीरामच्या घोषणा सुरू झाल्या. यामुळे त्या संतापल्या होत्या. त्या म्हणाल्या होत्या की, हा राजकीय कार्यक्रम नाही. सरकारी कार्यक्रमात शिष्टाचाराचे पालन व्हायला हवे. कोलकत्यात हा कार्यक्रम घेतल्याबद्दल पंतप्रधान आणि सांस्कृतिक मंत्रालयाचे मी आभार मानते. पण एखाद्याला व्यासपीठावर बोलावून त्याचा अपमान करणे शोभा देत नाही. याचा विरोध करत मी आणखी काही जास्त बोलणार नाही. जय हिंद, जय बांगला.
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.